…तर आपण घरी नातू-पणतू सांभाळत बसू – एकनाथ खडसे


जळगाव – विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर एकनाथ खडसे यांनी दिवाळीच्या फराळासाठी पत्रकारांना जळगावातील त्यांच्या ‘मुक्ताई’ या निवासस्थानी निमंत्रित केले होते. यावेळी माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी आपल्या मनातील उद्विग्नता व्यक्त करताना एकनाथ खडसे थकले आहेत, म्हातारे झाले आहेत, असे जर पक्षाला वाटत असेल तर आपण घरी नातू-पणतू सांभाळत बसू, असे म्हटले आहे. भाजपमध्ये गेल्या काही वर्षांपासून एकाकी पडलेले खडसे आक्रमक झाले आहेत. आता विखे पाटील यांच्यासारखे अनुभवी लोक भाजपकडे असल्यावर खडसेंची गरज भासणार नसल्याचाही चिमटा देखील खडसेंनी यावेळी काढला.

खडसे पुढे म्हणाले, 40 वर्षांचा राजकारणाचा मला अनुभव आहे. मी अनेक गोष्टी घडताना, बिघडताना पाहिल्या आहेत. तो अनुभव वाया जावू नये असे वाटत असल्यामुळेच या घटना आपण आत्मचरित्र लिहून त्यात सविस्तर मांडणार आहोत. त्यात 25-30 अशा घटना असतील; ज्या अद्याप कुणालाही माहिती नाहीत, असा गौप्यस्फोट देखील त्यांनी केला. सरकार विरोधी वक्तव्ये आपण कधीच केली नाहीत. पण आपली वक्तव्ये हे अर्धी तोडून मोडून दाखवली गेली असल्याचा आरोपच खडसेंनी केला. पक्षाकडून आपल्याला न्याय अपेक्षित असल्याचेही खडसे म्हणाले. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाबद्दल बोलताना खडसे म्हणाले की मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे तेच ठरलेले आहे आणि तेच होणार आहे. मुख्यमंत्रीपदी पुन्हा देवेंद्र फडणवीस विराजमान होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

आपण बाळासाहेब ठाकरेंकडे शिवसेनेचे नेते सुरेश जैन यांना मुख्यमंत्री बनवा हे सांगण्यासाठी गेलो होतो. त्यावेळी आपल्यासोबत नितीन गडकरी उपस्थित होते. पण सुरेश जैन हे व्यापारी असल्यामुळे बाळासाहेबांनी त्यांच्या हातात सत्ता देण्यास नकार दिला होता. त्यावेळेस बाळासाहेबांची उंची आपल्याला कळली, असे खडसे म्हणाले.

Leave a Comment