बौद्ध धर्मगुरू दलाई लामा जागतिक धम्म परिषदेसाठी औरंगाबादेत


मुंबई – औरंगाबाद येथे 22 ते 24 नोव्हेंबर दरम्यान जागतिक धम्म परिषदेचे आयोजन करण्यात आले असून या धम्म परिषदेसाठी बौद्ध धर्मगुरू दलाई लामा यांच्यासह श्रीलंका, जपान, चीन, इंडोनेशिया या देशातील धम्मगुरू आणि भिक्खू गण उपस्थित राहणार असल्याची माहिती बोधिसत्व पार्लो महाथेरो यांनी मुंबई येथे दिली. जगातील आर्थिक मंदी आणि शांतता यावर या परिषदेमध्ये चर्चा होणार आहे.

औरंगाबाद शहरातील मिलिंद महाविद्यालयाच्या नागसेनवन परिसरामध्ये जागतिक धम्म परिषद आयोजित करण्यात आली आहे. बौद्ध धर्मगुरू दलाई लामा यांच्यासह श्रीलंका येथील भन्ते गुणरत्न महानायक डॉ. वाराकागोडा महाथेरो यांच्यासह देशातून अनेक मान्यवर बौद्ध भिक्खू या परिषदेला उपस्थित राहणार आहेत. तथागत भगवान बुद्ध यांनी दिलेला शांतीचा संदेश हाच जगाला दुःख मुक्तीकडे घेऊन जाऊ शकतो, तर दुसरीकडे जगभरात निर्माण झालेली आर्थिक मंदी यावर बुद्धाच्या विचारातून मार्ग निघू शकतो, यावर या धम्म परिषदेमध्ये चर्चा केली जाणार आहे. १३ देशातील प्रतिनिधी या परिषदेत चर्चासत्रातून संवाद साधणार असल्याची माहिती बोधिसत्व पार्लो महाथेरो यांनी दिली.

या जागतिक धम्म परिषदेचे आयोजक आणि सनदी अधिकारी डॉ. हर्षदीप कांबळे यांनी सांगितले की, देशांमध्ये विचारवंताची अशा प्रकारची ही पहिली परिषद औरंगाबाद येथे होत आहे. या परिषदेच्या माध्यमातून विविध देशातील धम्मगुरू यांच्याशी विचारांची देवाणघेवाण होणार असून यासाठी श्रीलंका, नेपाळ, कंबोडिया, जपान, व्हिएतनाम, बर्मा, थायलंड यासह १३ देशातील बौद्ध भिक्खू उपस्थित राहणार आहेत. 22 नोव्हेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता या धम्म परिषदेचे उद्घाटन होणार आहे.

बौद्ध धर्मगुरू दलाई लामा हे २३ नोव्हेंबरला सकाळी नऊ वाजता जगभरातून आलेले मान्यवर भिक्खू गण हे जगप्रसिद्ध अजिंठा महामार्गावर थायलंड येथील उपासिका रोजना व्हनीच कांबळे आणि ज्येष्ठ अधिकारी डॉ. हर्षदीप कांबळे यांच्या दानातून निर्माण करण्यात आलेल्या भारतातील पहिल्या लोकुत्तरा भिक्खू सेंटर चौकाला भेट देणार आहेत. २४ नोव्हेंबरला सकाळी दहा वाजता दलाई लामा यांचे प्रवचन होणार आहे, अशी माहितीही यावेळी आयोजकांकडून देण्यात आली.

Leave a Comment