दिवाळीनंतर महायुतीची सत्तास्थापनेसाठी बैठक


मुंबई: काल राज्यातील विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर राज्यातील सत्तास्थापनेच्या हालचालींना आता वेग आला आहे. भाजपला या निवडणुकीत अपेक्षेपेक्षा कमी जागा मिळाल्या असल्यामुळे शिवसेनेची सत्तास्थापनेत भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शुक्रवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना फोनवरून शुभेच्छा दिल्या. त्यांच्यात यावेळी सत्तास्थापनेविषयी काही चर्चा झाली का, हे अद्याप गुलदस्त्यात आहे. पण, या दोन्ही नेत्यांची बैठक दिवाळीनंतर होणार असल्याचे कळते.

विधानसभा निवडणुकीत भाजपला १०५, शिवसेनेला ५६, राष्ट्रवादीला ५४ आणि काँग्रेसला ४४ जागा मिळाल्या असल्यामुळे शिवसेनेची महायुतीमधील बार्गेनिंग पॉवर वाढली आहे. त्यामुळे गुरुवारी झालेल्या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे यांच्या देहबोलीत आक्रमकता दिसून आली होती.

त्यांनी यावेळी म्हटले होते की, लोकसभा निवडणुकीवेळी ठरलेल्या फॉर्म्युलानुसार शिवसेना आणि भाजप यांच्यात विधानसभेला समसमान जागावाटप होणार हे ठरले होते. पण आमची अडचण भाजपच्या नेत्यांनी समजून घ्यावी, अशी विनंती केली होती. तेव्हा आपण अडचण समजून घेत विधानसभेच्या जागावाटपात कमीपणा घेतला. पण आता त्यांच्या अडचणी आणखी वाढणार असतील तर आम्हाला त्या समजून घेता येणार नाहीत. आता केवळ फिफ्टी-फिफ्टीच्या फॉर्म्युलाची अंमलबजावणी व्हावी. त्यासाठी संपूर्ण निकाल हातात आल्यानंतर शिवसेना-भाजपच्या नेत्यांनी एकत्र बसावे. गरज पडल्यास अमित शहा मुंबईत येतील, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले होते.

Leave a Comment