अवघ्या ५० रुपयांत पाहता येणार भारत वि. बांगलादेश कसोटी सामना


कोलकाता – टीम इंडिया आफ्रिकेविरूद्धची मालिका संपल्यानंतर बांगलादेशविरूद्धच्या अभियानाला सुरूवात करणार आहे. या संघामध्ये ३ नोव्हेंबर ते १० नोव्हेंबर दरम्यान तीन टी-२० तर, १४ नोव्हेंबर ते २६ नोव्हेंबर दरम्यान दोन कसोटी सामने खेळवण्यात येणार आहेत.

कोलकाताच्या ईडन गार्डन्सवर २२ नोव्हेंबर ते २६ नोव्हेंबर दरम्यान भारत आणि बांगलादेश संघामध्ये दुसरा कसोटी सामना खेळवण्यात येणार आहे. या सामन्यासाठी तिकिटांचे दर खाली आणण्यात आले आहेत. स्टेडियमवरील प्रेक्षकसंख्या वाढवण्यासाठी बंगाल क्रिकेट असोसिएशनने (सीएबी) तिकिटांची किमान किंमत ५० रुपये ठेवली आहे.

या गोष्टीची माहिती सीएबीचे सचिव अविषेक दालमिया यांनी दिली. जास्तीत जास्त लोक स्टेडियममध्ये कसे जमतील यासाठी तिकिटांची किंमत कमी ठेवण्यात आली आहे. शिवाय, हा सामना युवा क्रिकेटपटू मोफतही पाहता येईल याची व्यवस्था आम्ही केली असल्यामुळे ईडन गार्डनमधील तिकिटांची किंमत २००, १५०, १०० आणि ५० रुपये असेल, असे दालमिया यांनी म्हटले आहे.

तत्पूर्वी, बांगलादेश क्रिकेट संघाने पगार वाढवण्याच्या उद्देशाने कोणत्याही प्रकारच्या क्रिकेटमध्ये भाग घेण्यास नकार दिला आहे. संघातील सर्व खेळाडू संपावर गेले असून बांगलादेश क्रिकेट बोर्डाकडे पगारात वाढ करण्याची त्यांनी मागणी केली आहे. त्यामुळे भारत आणि बांगलादेश यांच्यात होणाऱ्या मालिकेवर संकट ओढवण्याची चिन्हे दिसत आहेत.

Leave a Comment