राज ठाकरेंना एक्झिट पोलमध्ये धक्का !


मुंबई – मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी यंदाच्या निवडणुकीत मनसेकडून सत्तेसाठी नाहीतर सक्षम विरोधी पक्ष होण्यासाठी निवडणूक लढवत असल्याचे जाहीर करून टाकले होते. एखादा पक्ष सभागृहात विरोधी पक्ष होण्यासाठी निवडणुका लढवत असल्याचे हे कदाचित देशातील पहिलेच उदाहरण असावे. लोकांना त्यांची ही भूमिका कितपत रूचली हे उद्या निकाल समोर आल्यानंतर स्षष्ट होणार आहे. पण मतदानोत्तर चाचणीमध्ये मनसेला ० ते २ जागा मिळतील असे सांगण्यात आल्याने राज्यात मनसे फॅक्टर चालणार नसल्याचे चित्र दिसत आहे.

राज ठाकरेंनी लोकसभेची निवडणूक न लढता महाराष्ट्रात ‘लाव रे तो व्हिडिओ’ असे म्हणत पंतप्रधान मोदी आणि अमित शहा यांच्यावर जोरदार टीका केली होती. महाराष्ट्रात त्यांच्या अनोख्या डिजीटल प्रचाराने त्यावेळी वेगळाच रंग आला होता. विधानसभेची निवडणूक आपण लढणार असल्याचे त्यावेळी राज ठाकरेंनी सांगितले होते. पण विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाल्यानंतरही फार काळ मनसे निवडणूक लढणार की, नाही अशी स्थिती निर्माण झाली होती. अखेर १०४ मतदारसंघात मनसेने उमेदवार उभे केले. पण राज ठाकरे लोकसभेप्रमाणे विधानसभेच्या प्रचारात तितके आक्रमक दिसले नाहीत.

राज ठाकरेंची निवडणुकीच्या तोंडावर कोहिनूर प्रकरणी सक्तवसुली संचालनालयाकडून (ईडी) चौकशी झाल्यानंतर बराच काळ राज ठाकरे जाहीरपणे काहीच न बोलल्यामुळे राज ठाकरे शांत झाल्याची टीका त्यांच्यावर झाली. मनसे गेल्या अनेक निवडणुकांपासून सातत्याने पिछाडीवर जात आहे. राज ठाकरेंच्या सभांना गर्दी होते. पण त्यांना मते मिळत नसल्याचे वारंवार दिसून आले आहे. मनसेसाठी यंदाची निवडणूक ही अस्तित्वाची लढाई मानली जात आहे. मात्र, एक्झिट पोलमध्ये मनसे तळाला गेल्याचे दिसत आहे. गुरुवारी निकालातही असेच चित्र दिसल्यास महाराष्ट्राच्या राजकारणात राज ठाकरे आणि मनसेचे काय होणार? असा प्रश्न निर्माण होत आहे.

Leave a Comment