इन्फोसिसचे अवघ्या काही मिनिटांमध्ये तब्बल ४५ हजार कोटी रूपयांचे नुकसान


नवी दिल्ली – सोमवारी देशातील सर्वात मोठी माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपनी इन्फोसिसच्या मॅनजमेंटवर गंभीर आरोप करण्यात आल्यानंतर कंपनीचे शेअर्स मंगळवारी सकाळपर्यंत १४ टक्क्यांपेक्षा अधिक पडल्यामुळे अवघ्या काही मिनिटांमध्ये गुंतवणुकदारांचे तब्बल ४५ हजार कोटी रूपयांचे नुकसान झाले.

इन्फोसिसचा शेअर शुक्रवारी ७६७.७५ रुपयांवर बंद झाला होता. तसेच जवळपास ३ लाख ३० हजार ७३ कोटी रूपये कंपनीचे मार्केट कॅप होते. कंपनीचे शेअर्स मंगळवारी १६ टक्क्यांनी पडले असून ते ६४५.३५ रूपयांवर पोहोचल्यानंतर कंपनीची मार्केट कॅपही कमी होऊन ती २ लाख ७७ हजार ४५० कोटी रूपयांवर पोहोचली. दरम्यान, यामुळे तब्बल ५२ हजार कोटी रूपयांचे नुकसान झाल्याचे गुंतवणुकदारांना पहायला मिळाले.

इन्फोसिसच्या कर्मचाऱ्याने गेल्याच आठवड्यात तिमाही वित्तीय निष्कर्ष जाहीर करणाऱ्या कंपनीच्या ताळेबंदात नफ्याची आकडेवारी फुगविण्यात आल्याचा आरोप केला आहे. संबंधित कर्मचाऱ्याने कंपनीच्या संचालक मंडळाला उद्देशून लिहिलेल्या चार पानी पत्रात आपले नाव जाहीर न करता आर्थिक ताळेबंदाच्या गैर व्यवहाराचा आरोप केला आहे. गेल्या तिमाहीचा कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याने सादर केलेला ताळेबंद चुकीचा असून त्यातील नफ्याची आकडेवारी ही खोटी असल्याचा दावा या कर्मचाऱ्याने याबाबतच्या पत्रात केला आहे.

हे पत्र पत्राखाली नाव न लिहिता कंपनीच्या संचालक मंडळाला रविवारी लिहिण्यात आले आहे. कंपनीचे मुख्य कार्यकारी सलिल पारेख या पत्रामुळे संशयाच्या भोवऱ्यात सापडले असून, लेखा परिक्षण समितीपुढे याबाबतचे म्हणणे मांडले असल्याचे स्पष्ट केले आहे. तर आपल्याकडे पत्रात करण्यात आलेल्या आरोपाबाबत पुरावे असल्याचे तक्रारदाराने म्हटले आहे. पत्रात व्हेरिझोन, इंटेल, एबीएन एम्रोसारख्याच्या अधिग्रहणाद्वारे झालेले महसुली उत्पादन ताळेबंदात नमूद केले त्याप्रमाणे प्रत्यक्षात नसल्याचेही नमूद करण्यात आले आहे. पत्रात ताळेबंदात नमूद व्हिसामूल्याबाबतची शंकाही उपस्थित करण्यात आली आहे.

Leave a Comment