११७ देशांच्या यादीत भारत उपासमारीत १०२ व्या क्रमांकावर


नवी दिल्ली : ग्लोबल हंगर इंडेक्सद्वारा (GHI) उपासमारीबाबत जाहीर करण्यात आलेल्या आकड्यांनुसार, भारत ११७ देशांमध्ये १०२ व्या क्रमांकावर असल्याचे समोर आले आहे. भारताच्या क्रमांकात २०१४ पासून सतत घट होत आहे. भारत २०१४ मध्ये ७७ देशांमध्ये ५५ व्या क्रमांकावर होता.

हंगर इंडेक्स ही जागतिक, राष्ट्रीय आणि प्रादेशिक पातळीवर कोणत्या भागात किती उपासमारी आहे? किती लोक रोज भुकेपोटी उपाशी राहतात याचे मापन करणारा हा अहवाल आहे. कुपोषण, बाल मृत्यूदर, वयानुसार कमी वाढ, उंचीनुसार कमी वजन या अहवालात जगभरातील कुपोषण आणि उपासमारीची नोंद अशा चार प्रमाणात केली आहे. विषेश बाब म्हणजे, या अहवालात पाकिस्तान, बांग्लादेश, श्रीलंकेहून भारत मागे आहे. पाकिस्तान या इंडेक्समध्ये ९४व्या क्रमांकावर, बांग्लादेश ८८व्या तर श्रीलंका ६६व्या क्रमांकावर आहे.

Welthungerhilfe आणि Concern Worldwide नावाच्या संस्थेने हा अहवाल तयार केला आहे. या अहवालात असे म्हटले आहे की, भारत जगातील ४५ देशांमध्ये असा देश आहे जिथे उपासमारीची परिस्थिती अतिशय गंभीर, चिंताजनक आहे. अहवालानुसार, भारतात ६ ते २३ महिन्यांमधील केवळ ९.६ टक्के मुलांना कमीतकमी पौष्टिक आहार मिळतो. २०१५-१६ पर्यंत ९० टक्के भारतीय कुटुंबात पिण्याच्या पाण्याचा चांगला स्रोत आहे, तर ३९ टक्के कुटुंबांमध्ये स्वच्छतेची कोणतीही सुविधा नसल्याचे समोर आले आहे. नेपाळ आणि बांग्लादेश या देशांनी लहान मुलांच्या पोषण आहाराच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पावले उचलली असल्याचे या अहवालात सांगण्यात आले आहे.

Leave a Comment