भुजबळांनी बाळासाहेब ठाकरेंच्या अटकेवर सोडले मौन


मुंबई – सध्याच्या घडीला राज्यात विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला वेग आला आहे. आरोपप्रत्यारोपाच्या फैरी राजकीय मैदानात झडत असून, सत्ताधारी आणि विरोधी पक्षांनी निकालात बाजी मारण्यासाठी सर्वस्व पणाला लावल्याचे चित्र आहे. प्रचारसभांचा धडाका एकीकडे सुरू असताना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना अटक करणे ही राष्ट्रवादीची चूक होती, अशी खंत राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी व्यक्त केली. तत्कालिन गृहमंत्री छगन भुजबळ यांनी या मुद्यावर मौन सोडले आहे.

शिवसेनाप्रमुख बा‌ळासाहेब ठाकरे यांना अटक करणे, ही राष्ट्रवादी काँग्रेसची चूकच होती. ही कारवाई फक्त काही वरिष्ठांच्या हट्टापायी करण्यात आल्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटले होते. आम्ही त्यावेळी बाळासाहेबांच्या अटकेविषयी संबंधित व्यक्तीला विचारले की असे का करत आहात, तेव्हा ते म्हणाले, की या विभागाचे आम्ही प्रमुख आहोत. जो निर्णय आम्हाला योग्य वाटतो तो आम्ही घेणार आहोत. अजित पवार यांनी असे म्हणत नेत्याच्या नावाचा उल्लेख टाळत सांगितले होते. पण छगन भुजबळ हे बाळासाहेबांना अटक झाली तेव्हा गृहमंत्री होते.

अजित पवार यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय चर्चेला उधाण आले. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही त्यावरून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीकास्त्र सोडले होते. अजित पवारांमध्ये हिंमत असेल तर ती चूक छगन भुजबळांची होती, असे नाव घेऊन सांगावे. ती चूक विभागाच्या प्रमुखांची होती, असे ते सांगत आहेत. पण शरद पवार हे त्यावेळी ती चूक करणार्‍यांचे बाप होते, हे विसरता येणार नसल्याचे ठाकरे म्हणाले होते.

राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी बाळासाहेबांना झालेल्या अटकेवरून सुरू झालेल्या राजकीय वादावर स्पष्टीकरण दिले आहे. छगन भुजबळ एका मुलाखतीत बोलताना म्हणाले, १९९९मध्ये प्रचार सुरू केला, आमच्या वचननाम्यात तेव्हा श्रीकृष्ण आयोगाने ज्या लोकांना दोषी ठरवले त्यांच्यावर योग्य कारवाई करू, असे म्हटलेले होते. त्यानंतर युतीचे १९९५ मध्ये सरकार आले. त्यावेळी बाळासाहेब ठाकरे आणि शिवसैनिकांविरूद्ध असलेल्या खटल्यांचा निपटारा करण्यात आला होता. परंतु, श्रीकृष्ण आयोगाची फाईल तशीच होती. ती फाईल नंतर माझ्यासमोर आली तेव्हा मी गृहमंत्री होतो. त्यामुळे इकडे आड तिकडे विहीर अशी माझी अवस्था झाली होती. त्यामुळे मला नाईलाजाने सही करावी लागली. पण हा मुद्दा आता संपला असल्याचे भुजबळ यांनी म्हटले आहे.

Leave a Comment