केंद्र सरकार देशातील अनेक रेल्वे स्टेशन आणि रेल्वेंचे खाजगीकरण करण्याच्या दिशेने पाऊले उचलत आहे. देशातील पहिली खाजगी रेल्वे तेजसला या आधीच उत्तर प्रदेश सरकारने हिरवा झेंडा दाखवलेला आहे. यानंतर आता केंद्र सरकारने 50 रेल्वे स्टेशन आणि 150 रेल्वेंचे खाजगीकरण करण्याच्या दिशेने तयारी केली आहे.
नीति आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत यांनी रेल्वे बोर्डाचे चेअरमन विनोद कुमार यादव यांना एक पत्र लिहिले आहे. यामध्ये त्यांनी लिहिले आहे की, रेल्वे मंत्रालयाने पॅसेंजर ट्रेनच्या संचालनासाठी खाजगी ट्रेन ऑपरेटर आणण्याचा निर्णय घेतला असून, पहिल्या टप्प्यात 150 रेल्वेंचे खाजगीकरण करण्याचा विचार केला जाईल.
50 रेल्वे स्टेशनच्या खाजगीकरणाबद्दल कांत म्हणाले की, याबाबत रेल्वे मंत्र्यांशी सविस्तर चर्चा करण्यात आलेली आहे. खाजगीकरणामुळे रेल्वे स्टेशन आणि ट्रेनच्या संचालनामध्ये अमुलाग्र बदल होतील असे सांगण्यात येत आहे.