नाथाभाऊ म्हणतात… महाआघाडीच होणार सत्तेवर विराजमान!


जळगाव – माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांना भाजप उमेदवारी नाकारल्यानंतर त्यांचे महाआघाडीवर असलेले प्रेम जरा जास्तच उफाळून यते असल्याचे दिसत आहे. जिल्ह्यातील रावेर येथे भाजपचे उमेदवार हरिभाऊ जावळे यांच्या प्रचाराच्या शुभारंभप्रसंगी विजयादशमीच्या मुहूर्तावर खडसेंनी सत्तेचा कौल महाआघाडीलाच मिळेल, असे वक्तव्य केले. महाआघाडीच्याच बाजूने येणाऱ्या २४ ऑक्टोबरचा निकाल हा लागणार असल्याचे खडसे यांनी म्हटल्यावर शेजारी बसलेले हरिभाऊ जावळे यांनी ही बाब खडसेंच्या लक्षात आणून दिल्यानंतर खडसेंनी माफ करा म्हणत आपली चूक सुधारली.

राज्यात सरकार महाआघाडीचेच येणार, असल्याचा सूतोवा करताच एकनाथ खडसे यांना झालेली चूक ध्यानात आली. त्यांनी क्षणार्धात सावरत, ते आमच्याकडे नाथाभाऊला पाडण्यासाठी आघाड्या बिघाड्या सुरू आहेत ना… त्यामुळे महाआघाडी चुकून तोंडात आले. त्यांनी यावेळी महायुतीचेच राज्य येणार, असा आत्मविश्वास प्रकट केला. त्यांच्यासोबत यावेळी खासदार रक्षा खडसे, उमेदवार हरिभाऊ जावळे उपस्थित होते. खडसे पुढे म्हणाले, बरेच रामायण घडले. महाभारताचाही पहिला अध्यायही आटोपला. पण, भाजपमध्येच नाथाभाऊ आहे. आता सब मिलके आओ और नाथाभाऊको गिराओ… म्हणून आघाड्या बिघाड्या सुरू आहेत. अरे हा नाथाभाऊ अभिमन्यू नाही, तर अर्जुन आहे. रणांगणातून बाहेर निघणे चांगले जाणतो. तो कधी अडकणार नाही. मिल गया तो मिल गया नही तो छोड दिया… तीर लगा तो ठीक है… नहीं तो कमान अपने पास है, अशा शब्दांत त्यांनी विरोधकांचा समाचार घेतला.

आपण समाजाच्या हितासाठी व कल्याणासाठी लढत देत आहोत. कोण्या एका समाजाच्या नेतृत्वासाठी आपण लढत देत नसल्याची कोपरखळी देखील त्यांनी हाणली. आम्ही आदिवासी, दलित अल्पसंख्याक, बहुजन, तळागाळातील शेवटच्या घटकातील दीनदुबळ्यांसाठी पोटच्या मुलासारखी सेवा केली आहे. म्हणून आपल्याकडे हक्काचे मतदान मागण्याचा अधिकार आम्हाला आहे आणि तो आम्ही हक्काने मिळवणारच, असा दावाही एकनाथ खडसे यांनी केला.

Leave a Comment