पाश्चिमात्यांच्या धर्म ग्रंथातून आला ‘मॉब लिंचींग’ हा शब्द – मोहन भागवत


नागपूर – नागपूरमध्ये दरवर्षीप्रमाणे आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या दसरा मेळाव्यात बोलताना सरसंघचालक मोहन भागवत यांनी ‘लिंचींग’ हा शब्द आपल्याकडचा नसून हा पाश्चिमात्यांच्या धर्मग्रंथातून आला असून आपल्या देशाला या मार्फत आंतरराष्ट्रीय पातळीवर बदनाम करण्याचा प्रयत्न असल्याचे म्हटले आहे.

भागवत ‘मॉब लिंचींग’बद्दल पुढे बोलताना, त्यांनी यामधील काही घटना बनावट असल्याचे सांगितले. यामध्ये एकाच समाजाला अनेकदा लक्ष्य केले जात असल्याचे दिसते. परंतु, हे कित्येकदा उलटे घडते, असे ते म्हणाले. यामार्फत ठराविक समाजाला बदनाम करण्याचे षडयंत्र आहे. याप्रकारच्या घटना झाल्या की, ही सर्व समुदायामधील ठराविक लोकांची कृत्ये असल्याचे दाखवले जाते, पण समुदायातील काही लोकांची कृत्ये संपूर्ण समुदायावर थोपवली जात असल्याचा आरोप मोहन भागवत यांनी केला. यामध्ये अनेकदा संघाचे नाव गोवण्यात येते. पण प्रत्यक्ष संघाचा याच्याशी कोणत्याही प्रकारच संबंध नसतो. संघासह हिंदुंचे नाव खराब करण्याचे हे षडयंत्र असल्याचे भागवत म्हणाले.

यावेळी, पुन्हा एकदा भाजपवर देशातील जनतेने विश्वास दाखवावा, असे आवाहन मोहन भागवत यांनी केले. सरसंघचालकांनी कलस 370 हटवल्याबद्दल सरकारचे कौतुक करत पंतप्रधानांनी हा प्रश्न कुशलतेने हाताळल्याचे म्हटले. तसेच चांद्रयान मोहिमेवरून त्यांनी वैज्ञानिकांची प्रशंसा केली असून सध्या देशात उत्साह व आत्मविश्वासाचे वातावरण असल्याचे सरसंघचालकांनी सांगितले. त्याचबरोबर लष्कराचे मनोबल सततच्या यशस्वी कारवायांमुळे वाढले आहे. तसेच देशाची समग्रता कायम ठेवण्यासाठी समुद्री भागात सुरक्षा वाढवण्याची गरज असल्याचे ते म्हणाले.

देशातील विविधता म्हणजे देशाचे भूषण असून समाजातील काही शक्तींचा या विविधतेला भाषिक, प्रांतीय, जातीयवादी, भौगोलिक घटकांवर भेदभाव करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. भारताची परंपरा उदारतावादाची असून, आपल्याकडे बुध्दाची शिकवण दिली जाते, असे वक्तव्य सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले आहे. देशाची प्रतिकार शक्ती समाजाच्या एकात्मतेत असून, देशाला आंबेडकरांच्या विचारांची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच लोकशाही फक्त पाश्चिमात्य देशांची मक्तेदारी नसून, ही आमची परंपरा आहे. सत्तेत असलेल्या स्वयंसेवकांची सुशासन ठेवण्याची जबाबदारी आहे, असेही ते म्हणाले.

Leave a Comment