नंदनवन पर्यटकांसाठी 10 ऑक्टोबरपासून होणार खुले


श्रीनगर : गृह विभागाने जम्मू-काश्मीरमधून अमरनाथ यात्रेकरु आणि पर्यटकांना माघारी पाठविण्याबाबत जारी केलेला 2 ऑगस्टचा आदेश जम्मू-काश्मीरचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी मागे घेतला असून येत्या 10 ऑक्टोबरपासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार असल्यामुळे काश्मीरचे नंदनवन पर्यटकांसाठी पुन्हा खुले होणार आहे.

हा निर्णय राज्यपाल मलिक यांनी घेतलेल्या उच्चस्तरीय बैठकीत घेण्यात आला. कलम 370 रद्द करण्यात आल्यानंतर प्रथमच पर्यटकांना आता जम्मू-काश्मीरमध्ये जाता येणार आहे. काश्मीर पर्यटकांसाठी मागील दोन महिन्यांपासून बंद होते.

याबाबत सरकारी प्रवक्त्यांनी सांगितले की, राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी आदेश दिले आहेत की, घाटी सोडून पर्यटकांना माघारी पाठविण्याबाबत गृह विभागाने जारी केलेला निर्णय तात्काळ मागे घेण्यात येत आहे. 10 ऑक्टोबरपासून राज्यपालांचा आदेश लागू होणार आहे.

जम्मू काश्मीर राज्याला विशेष दर्जा देणारे कलम 370 हटवल्यानंतर गुप्तचर यंत्रणेकडून काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ले होण्याची शक्यता वर्तवण्यात आल्यामुळे काश्मीर अमरनाथ यात्रेकरुंना तसेच पर्यटकांना सोडावे लागले होते. तेव्हापासून तब्बल दोन महिने काश्मीर पर्यटकांसाठी बंद होते.

Leave a Comment