आजपासून ‘सिंगल युज’ प्लास्टिकवर बंदी


नवी दिल्ली – आजपासून (2 ऑक्टोबर) महात्मा गांधी जयंती दिनाचे औचित्य साधून सिंगल युज प्लास्टिकवर पुर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. एकदा वापरात येणा-या प्लास्टिक बंदीचा वापर टाळण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले होते. संपूर्ण देशभरातून या आवाहनाला उत्तम प्रतिसाद मिळू लागला असून आजपासून 100% प्लास्टिक बंदी करण्यात येणार आहे. सर्व राज्य सरकारांना आणि केंद्रशासित प्रदेशांना यासंदर्भात मार्गदर्शक सूचनाही जारी केल्या आहेत. याआधीच प्लास्टिक बंदीची घोषणा करण्यात आली होती. पण ब-याच ठिकाणी सर्रासपणे प्लास्टिकचा वापर होताना दिसत होता. त्यामुळे आता सिंगल युज प्लास्टिक वापरावर पुर्णपणे बंदी घालण्यात आली आहे.

सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीलाच प्लास्टिक बंदीबाबत पर्यावरण मंत्रालयाने मार्गदर्शक सूचना जारी केल्या होत्या. यामध्ये सरकारी कार्यालये, खासगी आणि सार्वजनिक कार्यालयांमध्ये प्लास्टिकची फुले, झेंडे, फुलांचे पॉट्स, बाटल्या, स्टेशनरी वस्तू आदि वस्तूंचा वापर न करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

आजपासून देशभरात ही प्लास्टिक बंदी लागू करण्यात आली आहे. पुण्यामध्ये सिंगल युज प्लास्टिकच्या वस्तू, पिशव्याची विक्री अथवा वापर करताना कोणी आढळून आल्यास संबंधित व्यक्तीवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असून 5,000 रुपये दंड आकारण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्याचबरोबर देशभरातील पर्यटन स्थळे, धार्मिक स्थळे, समुद्र किनारे, शाळा आणि महाविद्यालयांमध्ये प्रामुख्याने यावर लक्ष ठेवण्याच्या सूचनाही करण्यात आल्या आहेत.

Leave a Comment