आदित्य ठाकरेंची वरळीतील गुजराती समाजाला साद


मुंबई – मुंबईत शिवसेनेची स्थापना मराठी माणसाच्या हक्कासाठी झाली. पण हा मुद्दा कालांतराने निवडणुकीच्या राजकारणात काहीसा बाजूला ठेवून निवडून येण्याला प्राधान्य दिले जात आहे. ठाकरे घराण्याच्या इतिहासात आदित्य ठाकरे पहिल्यांदा निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. मोठ्या मताधिक्याने त्यांना निवडून आणण्यासाठी वरळीतील गुजराती भाषिकांना केम छो वरली अशा मोठ्या होर्डिंग्जच्या माध्यमातून साद घातली जात आहे.

जवळपास 40 लाख हून अधिक गुजराती भाषिक मुंबईमध्ये असल्याचे सांगण्यात येते. तब्बल 25 हजार गुजराती भाषिक मतदार वरळी मतदारसंघात आहेत. त्यांच्याच भाषेत या मतदारांना आकर्षित करण्यासाठी शिवसेनेला आता मराठी ऐवजी गुजराती भाषेचा आधार घ्यावा लागत आहे. शिवसेनेचे सुनील शिंदे यांनी या मतदारसंघात गेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे दिग्गज सचिन अहिर यांचा पराभव केला होता. साहजिकच शिवसेनेने अहिर डोकेदुखी ठरू नयेत यासाठी अहिर यांनाच पक्षात ओढून घेतल्यामुळे आदित्य ठाकरे यांचा विजय सोपा झाला आहे. मात्र, शिवसेनेच्या युवराजांचा विजय कमी मताधिक्याने झाल्यास त्याचा दूरगामी परिणाम टाळण्यासाठी सेनेकडून मोर्चे बांधणी सुरू आहे. आज पासूनच आदित्य ठाकरे प्रचाराच्या मोहिमेला सुरुवात करत आहेत. ते नवरात्रोत्सवा दरम्यान तेथील मंडळांना भेटी देऊन कार्यकर्त्यांशी ही चर्चा करणार आहेत.

Leave a Comment