मोदी सरकार देणार सरदार पटेल यांच्या नावे ‘सर्वोच्च नागरी पुरस्कार’


नवी दिल्ली : केंद्र सरकारकडून भारताची एकता आणि अखंडतेसाठी महत्त्वाचे योगदान देणाऱ्या व्यक्तीच्या यथोचित गौरव करण्यासाठी सरदार पटेल राष्ट्रीय एकता पुरस्काराची (Sardar Patel National Unity Award) घोषणा करण्यात आली आहे. त्याचबरोबर केंद्र सरकारकडून हा सर्वोच्च नागरी पुरस्कार असेल असे स्पष्ट करण्यात आले आहे.

पुरस्कार्थीचा पदक आणि प्रशस्तीपत्रक प्रदान करुन गौरव करण्यात येणार आहे. पुरस्कारासोबत कुठलीही रक्कम मानकऱ्यांना दिली जाणार नाही. हे पुरस्कार मरणोत्तर प्रदान केले जाणार नाहीत. या पुरस्कारांची घोषणा राष्ट्रीय एकता दिवस अर्थात सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीला (31 ऑक्टोबर) केली जाणार आहे. या पुरस्काराने प्रत्येक वर्षी जास्तीत जास्त तिघा जणांचाच सन्मान केला जाईल.

आतापर्यंत ‘भारतरत्न’ हा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान केला जातो. सरदार पटेल राष्ट्रीय एकता पुरस्कार हे त्यापेक्षाही सर्वोच्च असणार का, याबाबत स्पष्टता नाही.

गृह मंत्रालयाने याआधीही सरदार पटेल राष्ट्रीय एकता पुरस्कार सुरु करण्याबाबत अधिसूचना जारी केली होती. हे पुरस्कार राष्ट्रीय एकता आणि अखंडतेला प्रोत्साहन देणे आणि अखंड भारताचं मूल्य अधिक सुदृढ करण्याच्या हेतूने सुरु केले जात असल्याचे केंद्रीय गृहमंत्रालयाने स्पष्ट केले आहे.

हे पुरस्कार पद्म पुरस्कारांप्रमाणेच राष्ट्रपती भवनात सोहळा आयोजित करुन राष्ट्रपतींच्या हस्ते प्रदान केले जातील. यासाठी पंतप्रधानांकडून पुरस्कार समिती स्थापन केली जाईल. मंत्रिमंडळ सचिव, पंतप्रधानांचे प्रधान सचिव, राष्ट्रपतींचे सचिव, गृह सचिव यामध्ये सदस्य असतील. याशिवाय पंतप्रधानांनी नियुक्त केलेले तीन-चार जणही या समितीवर निवडले जातील.

‘सरदार पटेल राष्ट्रीय एकता पुरस्कारा’साठी भारतातील कोणतीही संस्था किंवा संघटना किंवा भारतीय नागरिक योग्य व्यक्तीचे नामांकन देऊ शकतील. स्वतःचे नामांकनही एखादी व्यक्ती देऊ शकते. राज्य सरकार, केंद्रशासित राज्यातील प्रशासन, मंत्रालयही नॉमिनेट करु शकतात. पुरस्कारासाठी दरवर्षी अर्ज मागवले जातील. गृहमंत्रालयाने तयार केलेल्या वेबसाईटवर ऑनलाईन अर्ज सादर केले जाऊ शकतात.

Leave a Comment