‘या’ पाच खेळाडूंची टी-20 विश्वचषक स्पर्धेआधी होऊ शकते टीम इंडियात एण्ट्री


भारतीय संघात अद्यापही मधल्या फळीत चांगले फलंदाज नसल्याचा प्रत्यय दक्षिण आफ्रिके विरोधात झालेल्या अखेरच्या टी-20 सामन्यात झाला. अखेरच्या टी-20 सामन्यात भारताने सुमार फलंदाजी केली. सलामीच्या फलंदाजापासून ते सलामीच्या फलंदाजांना कोणालाही चांगली कामगिरी करता न आल्यामुळे विराटला युवा खेळाडूंवर अवलंबून राहावे लागणार आहे.

ऋषभ पंत टी-20 क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करू न शकल्यामुळे इशान किशनला टी-20 विश्वचषक स्पर्धेमध्ये संधी मिळू शकते. भारतीय अ संघाकडून खेळताना इशान किशनने चांगली फलंदाजी केली होती. त्याचबरोबर इशानने आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून नेहमीच चांगली फलंदाजी केली आहे.त्याचबरोबर संघात केरळचा फलंदाज संजू सॅमसन यालाही स्थान मिळू शकते. निवड समितीने याआधी ऋषभ पंतच्या जागी इशान किशन आणि संजू सॅमसन या दोन नावांची शिफारस केली होती.

2015मध्ये केरळचा फलंदाज संजू सॅमसनने एकमात्र आंतरराष्ट्रीय टी-20 सामना खेळला. पण आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सकडून खेळताना शानदार प्रदर्शन केले आहे. सध्या संजू फॉर्ममध्येही आहे. इंडिया अ आणि दक्षिण आफ्रिका अ यांच्यात झालेल्या सामन्यात संजूने 48 चेंडूत 91 धावा केल्या असल्यामुळे त्याला संघात जागा मिळू शकते.

शुभमन गिल हे एक नाव टी-20 संघात जागा मिळवण्यासाठी आघाडीवर आहे. याआधी शुभमनने भारताच्या कसोटी संघात जागा मिळवली. पण त्याने आयपीएलमध्ये कोलकाता संघासोबत 37 सामन्यात 132च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी केली आहे.

भारतीय संघात संधी मिळण्याच्या यादीत कर्नाटकचा फिरकी गोलंदाज श्रेयस गोपाळ याच्या नावाचा देखील समावेश आहे. आयपीएलमध्ये श्रेयसने 14 सामन्यात 20 विकेट घेतल्या होत्या. त्यानंतर त्याची श्रीलंका अ संघा विरोधात झालेल्या मालिकेतील संघात जागा मिळाली होती.

दरम्यान आणखी एक खेळाडू टी-20 विश्वचषक स्पर्धेमध्ये टीम इंडियात संधी मिळावी यासाठी धडपडत आहे. दिनेश कार्तिक असे या खेळाडूचे नाव आहे. मागच्या वर्षी ऑस्ट्रेलियाविरोधात झालेल्या सामन्यात 35 वर्षीय कार्तिकने 30 आणि 22 धावा केल्या असल्यामुळे कार्तिकला आयपीएलच्या खेळीवर संघात स्थान मिळेल.

Leave a Comment