बांगलादेशविरुध्द होणाऱ्या मालिकेतून धोनीचा काढता पाय


नवी दिल्ली – नोव्हेंबरमध्ये बांगलादेशविरुध्द होणाऱ्या टी-२० सामन्यांसाठी टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी उपलब्ध नसल्याची माहिती सूत्रांनी दिली असल्यामुळे क्रिकेटच्या मैदानावरील धोनीचा प्रवेश लांबला असल्याचे समजते. तसेच धोनी पुढच्या आठवड्यापासून सुरू होणाऱ्या विजय हजारे ट्रॉफीमध्येही खेळणार नसल्याची माहिती मिळाली आहे.

भारताचा आयसीसी विश्वचषक २०१९ च्या स्पर्धेत उपांत्यफेरीत पराभव झाल्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून महेंद्रसिंह धोनीने ब्रेक घेतला आहे. त्याने या स्पर्धेनंतर वेस्ट इंडीज आणि मायदेशात सुरू असलेल्या दक्षिण आफ्रिकेविरुध्दच्या मालिकेतून माघार घेतली. दरम्यान, धोनी सुमारे दोन महिन्यांचा ब्रेक घेऊन सप्टेंबरमध्ये क्रिकेटच्या मैदानात उतरेल, अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. पण आपला ब्रेक धोनीने अजून अडीच महिने वाढवल्याचे समजते.

धोनीने ब्रेक घेतल्यानंतर, लष्करी जवानांसोबत वेळ घालवणे पसंत केले. काश्मीरच्या खोऱ्यात त्याने जवानांसोबत गस्त घातली. यादरम्यान, त्याच्या निवृत्तीबाबतच्या अफवा पसरल्या होत्या. टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने टी-२० विश्वचषक स्पर्धा २०१६ चा एक धोनीसोबतचा फोटो शेअर केला होता. त्यानंतर धोनी पत्रकार परिषद घेऊन निवृत्तीची घोषणा करेल, अशा चर्चा रंगल्या होत्या.

पण माध्यमामध्ये याविषयी चर्चा रंगल्यानंतर, हा फोटो आपण सहजच अपलोड केला होता, असे स्पष्टीकरण विराटने दिल्यामुळे त्या चर्चांना पूर्णविराम मिळाला. दरम्यान, धोनीने निवृत्तीबाबत अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नसल्याचे निवड समितीचे अध्यक्ष एमएसके प्रसाद यांनी स्पष्ट केले आहे.

Leave a Comment