विद्यमान 25 आमदारांना नारळ देणार भाजप !


मुंबई : विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजल्यानंतर आता उमेदवार याद्या निश्चितचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. बीडमध्ये 5 उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेसने जाहीर केल्यानंतर, 50 उमेदवारांची यादी काँग्रेसनेही निश्चित केल्याची माहिती मिळत आहे. अशा परिस्थितीत सत्ताधारी भाजपने 115 उमेदवारांची यादी तयार केल्याचे भाजपच्या खात्रीलायक सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.

विशेष म्हणजे 115 जणांच्या यादीत विद्यमान 25 आमदारांची नावे गाळण्यात आली आहेत. त्यांना नारळ मिळणार असल्याचे सांगण्यात येत आहे. सर्व्हेमध्ये ज्या आमदारांच्या नकारात्मक कामगिरीचा अहवाल आला, अशा आमदारांना यंदा तिकीट मिळणार नाही.

100 विद्यमान आमदारांचा भाजपच्या यादीत समावेश आहे. तर इतर पक्षातून आलेल्या 15 जणांनाही या यादीत स्थान देण्यात आले आहे. भाजपने लोकसभा निवडणुकीवेळीही अनेक विद्यमान खासदारांचे तिकीट कापले होते. यामध्ये किरीट सोमय्या, सोलापूरचे शरद बनसोड, पुण्याचे अनिल शिरोळे, नगरचे दिलीप गांधी, दिंडोरीचे हरीशचंद्र चव्हाण, लातूरचे सुनील गायकवाड यांचा समावेश होता.

2014 च्या विधानसभा निवडणुकीत भाजप 122 जागा जिंकत, सर्वात मोठा पक्ष ठरला होता. पण यंदा भाजपची शिवसेनेसोबत युती आहे. युती करताना दोन्ही पक्ष सम-समान जागा लढवण्याचे ठरले होते. गेल्या निवडणुकीत शिवसेनेने 63 जागी विजय मिळवला होता. त्यामुळे आता दोन्ही पक्षात कोणता फॉर्म्युला निश्चित होतो हे पाहणे महत्त्वाचं ठरणार आहे.

Leave a Comment