नववधूचा लग्नानंतर चौथ्या दिवशी फोटोग्राफरसोबत फरार


लग्नानंतर अवघ्या चार दिवसात नववधू प्रियकरासोबत पळून गेल्याचा अजब प्रकार घडला आहे. फोटोग्राफरच्या प्रेमात महिन्याभरापूर्वी पडलेली तरुणी माहेरी येण्याच्या निमित्ताने प्रियकराचा हात धरुन पळून गेली.

हे प्रेमाचे त्रांगड दिल्लीतील गोकुलपुरी भागात घडले. संबंधित तरुणीचे लग्नाच्या महिनाभर आधी एका तरुणावर प्रेम जडले. लग्न अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्याने तिला लग्न मोडण्याचा धीर होईना. अखेर लग्नानंतर पळून जाण्याचा निर्णय तिने घेतला.

तरुणीचा प्रियकरच लग्नाच्या दिवशी फोटो काढण्यासाठी विवाहस्थळी आला. दोघांनी सप्तपदीनंतर मंडपातूनच पोबारा करण्याचा प्लान आखला होता. पण योजना यशस्वी न झाल्यामुळे ते दुसऱ्या संधीच्या शोधात होते. नववधूने लग्नाच्या पहिल्या रात्री नवरदेवाशी शारीरिक संबंध ठेवण्यास नकार दिला. आपल्याला किमान सहा महिन्यांचा अवधी देण्याची मागणी तिने केली. ही गोष्ट नवरदेवाला रुचली नाही. ही गोष्ट त्याने आपल्या सासूबाईंच्या कानावर घातली. त्यांनी लेकीला समजवण्याचा प्रयत्न केला, मात्र ती ठाम होती.

तरुणी लग्नाच्या चार दिवसांनंतर विधींसाठी माहेरी आली. त्यावेळी प्रियकर आणि तिची पुन्हा भेट घडली. ही संधी न दवडता दोघांनीही पळून जाण्यात यश मिळवले. सोबत जाताना ती आपले स्त्रीधनही घेऊन पळून गेली. आपली मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार तरुणीच्या माहेरच्या मंडळींनी पोलिसात नोंदवली. तिने संध्याकाळी फोन करुन आपण मैत्रिणीकडे आल्याचे सांगितले. पण या गोष्टीची घरच्यांना कुणकुण लागली. नवरदेवानेही तात्काळ घटस्फोटासाठी अर्ज केला आहे.

Leave a Comment