उदयनराजेंच्या स्टाईलवरुन शिवसेनेचा चिमटा


मुंबई – शिवसेनेने नुकतेच भाजपमध्ये दाखल झालेले राष्ट्रवादीचे काँग्रेसचे खासदार उदयनराजे भोसलेंना जोराचा चिमटा काढला आहे. कॉलर उडवण्याची स्टाईल आणि बोलणे यामुळे साताऱ्याचे माजी खासदार उदयनराजे भोसले सुप्रसिद्ध आहेत. भाजप हा शिस्तीचा पक्ष आहे. भाजपचा डोलारा शिस्त, तत्त्व, संस्कार, नीतिमत्ता व साधनशुचिता या पंचसूत्रीवर उभा आहे. दिल्लीतील तेव्हाच्या हायकमांडला थोरल्या छत्रपतींनी जुमानले नव्हते. दिल्लीत जाऊन हायकमांडच्या आशीर्वादाने उदयनराजेंनी भाजपचा रस्ता पकडला व भाजपमध्ये प्रवेश घेताना कॉलर उडवली नाही. राजांना शिस्तीचे वळण लागत असल्याचे मिश्कील भाष्य शिवसेनेने केले आहे.

उदयनराजे भोसले यांच्या शिस्तीवर शिवसेनेने मुखपत्र असलेल्या ‘सामना’च्या अग्रलेखातून प्रकाशझोत टाकला आहे. शरद पवारांची साथ सोडून सातारचे श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी भाजपचा मार्ग स्वीकारला आहे. सध्या आयाराम-गयारामांचा मुसळधार मोसम सुरूच आहे. पाऊस थांबत नाही तसा हा मोसमही थांबत नाही. महाराष्ट्रात मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत इतर सर्व मंडळी भाजपमध्ये प्रवेश घेत असतात, पण शिवरायांच्या सातारच्या गादीचे उदयनराजे हे तेरावे वंशज असल्याने अमित शहा यांच्या दिल्लीतील बंगल्याच्या हिरवळीवर त्यांचा प्रवेश झाला आहे. भाजप हा शिस्तीचा पक्ष आहे. शिस्त, तत्त्व, संस्कार, नीतिमत्ता व साधनशुचिता या पंचसूत्रीवर भाजपचा डोलारा उभा आहे. व्यासपीठावर अमित शहा किंवा पंतप्रधान मोदी असताना शिट्या मारणे, कॉलर उडवणे, इतर नाट्यछटा करणे हे असले प्रकार भाजपच्या शिस्तीत बसत नाहीत (त्यांचा हा बेशिस्तपणा शरद पवारांनी खपवून घेतला) याची कल्पना देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील यांनी सातारच्या राजांना एव्हाना दिली असेल. येथे हायकमांड आहे व ते दिल्लीत आहे. दिल्लीतील तेव्हाच्या हायकमांडला थोरल्या छत्रपतींनी जुमानले नव्हते. दिल्लीत जाऊन हायकमांडच्या आशीर्वादाने उदयनराजेंनी भाजपचा रस्ता पकडला व भाजपमध्ये प्रवेश घेताना त्यांनी कॉलरही उडवली नाही. शिस्तीचे वळण राजांना लागत आहे, अभिनंदन!, असे शिवसेनेने म्हटले आहे.

ईव्हीएम’विषयीदेखील उदयनराजे यांचे वेगळे मत होते. शिवसेनेच्या नरेंद्र पाटील यांनी लोकसभा निवडणुकीत उदयनराजेंना जेरीस आणलेच होते. तीन-चार लाखांच्या मताधिक्याने एरवी जिंकणारे राजे या वेळी ‘दम’ खात जिंकले. मराठा आरक्षणाच्या आंदोलनात उदयनराजे हे रस्त्यावर उतरले होते व त्यांचा साताऱ्यातील तरुण वर्गात वावर आहे. उदयनराजे यांना जाळय़ात ओढल्यामुळे पश्चिम महाराष्ट्रातील मराठा समाजाची मते पदरात पडतील असे भाजपचे गणित आहे, पण फक्त एकाच जातीचे शिवराय हे नव्हेत, तर सर्वच जाती-धर्मांच्या लोकांचे दैवत असल्यामुळे शिवरायांचे तेरावे वंशज एका जातीच्या राजकारणाचे ‘मोहरे’ म्हणून राजकारणात वापरले जात असतील तर तो शिवरायांच्या विचारांचा अपमान ठरेल. अर्थात अत्यंत विचारपूर्वकच उदयनराजे यांनी भाजप प्रवेशाचा निर्णय घेतला असल्याचे मत शिवसेनेने व्यक्त केले आहे.

उदयनराजे हे सातारचे शेवटचे छत्रपती श्रीमंत प्रतापसिंह भोसले यांचे वारसदार असून सातारच्या छत्रपती घराण्यातील धाकटय़ा शाहूंचे प्रतापसिंह हे वडीलपुत्र. त्यांनी व त्यांच्या मातोश्रींनी पेशव्यांच्या ताब्यातून सुटण्यासाठी इंग्रजांची मदत मागितली. एल्फिन्स्टनने मदत देण्याचे आनंदाने कबूल केले. इंग्रज आणि पेशवे यांची त्यावेळी लढाई चालू होती. पेशव्यांचा, बापू गोखल्यांचा पाडाव झाला. प्रतापसिंह ठरल्याप्रमाणे लष्कराच्या मागे उभेच राहिले होते. स्मिथने त्यांना ताब्यात घेऊन त्यांची रवानगी एल्फिन्स्टनकडे केली. सातारा त्यापूर्वीच इंग्रजांनी ताब्यात घेतला होता. आपला मान राखत नाहीत व आपणावर इंग्रज अपमानास्पद अटी लादत असल्याचे प्रतापसिंहांना समजल्यावर इंग्रजांविरुद्ध त्यांनी बंडाळय़ा सुरू केल्या आणि बेबनाव होऊन छत्रपतींना पदभ्रष्ट व्हावे लागले. बंडाचा आरोप त्यांच्यावर ठेवून त्यांना कराचीत ठेवण्यात आले. तेथे त्यांचे खूपच हाल झाले. प्रतापसिंह सत्याचे मोठे पुरस्कर्ते आणि निश्चयी होते. पदभ्रष्ट करणाऱ्या इंग्रज अधिकाऱ्याला त्यांनी तोंडावर ताडकन जबाब दिला, राज्य जाईल अशी धमकी देता कशाला? मी कधीच राज्याची हाव धरलेली नाही. उघड चौकशीशिवाय केलेले आरोप मुकाट्याने मान्य करून राज्यावर राहण्याची माझी इच्छा नाही. लक्षात ठेवा, प्रतापसिंहाची मान रेसभरसुद्धा वाकणार नाही. फायद्याचा किंवा स्वार्थाचा लोभ धरून मी आपले चारित्र्य कलंकित करून घेणारा नव्हे. तुमच्या चिठोऱ्यांवर मी नाही सही करीत, जा. असे बाणेदारपणे सांगून स्वाभिमानाने मरण पत्करणाऱ्या छत्रपती प्रतापसिंहांचे उदयनराजे हे वंशज आहेत याचे भान ते निश्चितपणे ठेवतील.

Leave a Comment