काँग्रेस-राष्ट्रवादीने आत्मचिंतन-आत्मपरीक्षण करावे – उदयनराजे


सातारा – काल साताऱ्यात मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा पोहोचली. त्यावेळी साताऱ्यात मुख्यमंत्र्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. सातारा सैनिक शाळा मैदानावर मुख्यमंत्र्यांची जाहीर सभा झाली. व्यासपीठावर यावेळी उदयनराजे आणि शिवेंद्रराजे भोसले उपस्थित होते. यावेळी आपल्या भाषणात उदयनराजे यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीवर टीका केली.

सत्तेत आघाडी सरकार असताना 1 रुपयाचे काम झाले नाही. मंत्रालयात कोणतेही काम मी घेऊन गेलो तर माझी फाईल कचऱ्याच्या डब्यात फेकली जायची. पण भाजप आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधी पक्षात असून सुद्धा साताऱ्याच्या विकासासाठी 15 हजार कोटीची कामे केल्यामुळे मी भाजपमध्ये गेलो असल्याचे स्पष्टीकरण उदयनराजे यांनी दिले. उदयनराजेंनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर काँग्रेस-राष्ट्रवादीला सल्ला दिला आहे. ते म्हणाले, लोक या दोन्ही पक्षाला सोडून का जात आहेत. याचे आत्मचिंतन आणि आत्मपरीक्षण दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी करावे.

असा निर्णय मला एक-दोन नाही तर आयुष्याच्या 15 वर्षांनंतर का घ्यावा लागला? पक्षाने याचा विचार करायला हवा. माझ्या नावावर पंधरा वर्षे फुली होती. कोणती फाईल मी घेऊन गेलो की ती कचऱ्याच्या डब्यात टाकली जात होती. एवढे सहन करुन सुद्धा त्यांनी माझी कामे केली नाहीत. राष्ट्रवादीने त्यासाठी मला सहनशीलतेचा तरी पुरस्कार द्यायला हवा होता, असे म्हणत राष्ट्रवादीला खोचक टोला लगावला.

ते म्हणाले, पक्षात असून सुद्धा मी नसल्यासारखा होतो. जी कामे मी केली ती रेटून केली म्हणून झाली. सत्तेत असताना 1 रुपयांचे काम झाले नाही. या विकासकामांसाठी मला नळावर भांडावे लागते तसे पक्षाबरोबर भांडावे लागले. यावेळी उदयनराजे मुख्यमंत्री आधी देखील होते आणि आता देखील आहेत, असे म्हणत राष्ट्रवादीबरोबरच माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यावरही टीका केली.

माझी कामे सत्तेत असताना झाली नाहीत. मात्र, विरोधी पक्षाचा मी खासदार असून देखील साताऱ्यामध्ये युतीच्या काळात 680 कोटी रुपयांची काम केली. 15 हजार कोटीची रेल्वेची कामे झाली. राष्ट्रवादीने घोंगंड भिजत ठेवायचे काम केले. मी आघाडी सरकारच्या काळात अँग्रीकल्चर विद्यापीठाचा प्रकल्प, शिवाजी विद्यापीठ उपकेंद्र, मेडिकल कॉलेजबाबत पाठपुरवठा केला. पण राष्ट्रवादीने उत्तर दिले जिल्ह्यात जागा कुठे आहे? मी त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांकडून जिल्ह्यातील सरकारी जागेची यादी मागवली आणि ती यादी 9 वेळा आघाडीच्या संबंधित मंत्र्यांना दिली. पण तरीही आघाडी सरकारने खासकरुन राष्ट्रवादीने याकडे लक्ष दिले नाही. ते पुढे म्हणाले, माझा बँड वाजावयाचा विचार करु नका, कारण मी बँडमास्टर आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्याचे संपूर्ण मंत्रीमंडळ चांगले काम करत आहेत. मला सुद्धा वाटले होते. ईव्हीएममध्ये काहीतरी घोटाळा असले पण मी स्वतः विचार केला तेव्हा लक्षात आले, की अनेक दिवसांपासून रखडलेली कामे मुख्यमंत्री आणि चंद्रकांत पाटलांनी मार्गी लावल्यामुळे हा घोटाळा नाही हे माझ्या लक्षात आले. 2006 साली कृष्णा खोरे प्रकल्प पूर्ण होणे गरजेचे होते. मात्र, 2019 उजाडले तरी पूर्ण झाले नाही. 13 वर्षे आघाडी सरकारने उशीर लावला. हा प्रकल्प काँग्रेस आणि राष्ट्रवादीने योग्यप्रकारे न राबवल्यामुळे कृष्णा खोरेबाबत चौकशी समिती नेमा, अशी मागणी करत आघाडी सरकारने एक पिढी बर्बाद केली, अशी टीका उदयनराजे यांनी केली. तुकड्याची भाषा करु नका, कारण सध्या या दोन पक्षाची अवस्था तुकड्या प्रमाणे झाली आहे. त्यांनी योग्यवेळी चिंतन केले असते तर आता आत्मक्लेश करण्याची वेळ आली नसते, असेही उदयनराजे म्हणाले.

मी संबंधित व्यक्तीकडे साताऱ्याच्या विकासाबाबत फाईलवर सही करण्यासाठी गेलो. त्यावेळी मला त्यांच्या पेनमधील शाई संपली असेल असे वाटले. म्हणून पेन घेवून गेलो. पण सही न करता किल्ला म्हणत पेन त्यांनी खिशाला लावला.

Leave a Comment