सरफराजबाबत पीसीबीने घेतला ‘हा’ निर्णय


कराची – आयसीसी एकदिवसीय विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतून पाकिस्तान बाहेर पडल्यानंतर पाकिस्तानचा कर्णधार सरफराज अहमद याच्यावर खुप टीका झाली. कर्णधारपदावरुन त्याला काढण्यात यावे असा सूर चाहत्यांमध्ये उमटला होता. पण, त्याच्याविषयी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने एक चांगला निर्णय घेतला आहे.

पाकिस्तान क्रिकेटच्या कर्णधारपदी सरफराजला कायम ठेवण्यात आले आहे. सरफराज श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेसाठी पाकिस्तानचा कर्णधार असणार आहे. तर, बाबर आझमला उपकर्णधारपद देण्यात आले आहे. यावर प्रतिक्रिया देताना सरफराज म्हणाला, मला खुप सन्मानित झाल्यासारखे वाटत आहे. मला कर्णधारपद भूषवणे आवडते. मी संघासाठी नेहमी चांगले योगदान देण्याचा प्रयत्न करेन. त्यासाठी मी माजी कर्णधार मिसबाहची मदत घेईन.


सरफराज पुढे म्हणाला, आम्ही एकदिवसीय क्रिकेटमध्ये चांगले प्रदर्शन केलेले नाही, मला माहित आहे. आमच्या चाहत्यांनाही आम्ही निराश केले आहे. पण, आम्हाला आशा आहे की ही नुकसानभरपाई आम्ही लवकर करू. श्रीलंकेविरुद्ध बाबर आझमला तीन एकदिवसीय आणि तीन टी-२० सामन्यांसाठी उपकर्णधारपद देण्यात आले आहे.

भारताने विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत पाकिस्तानचा एकतर्फी पराभव केला. पाकिस्तानच्या खेळाडूंना या सामन्यानंतर सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आले. काही पाकिस्तानी चाहत्यांनी तर खेळाडूंना शिवीगाळ केल्याचेही समोर आले होते. यामध्ये प्रामुख्याने कर्णधार सर्फराज अहमद, शोएब मलिक यांच्यावर चाहत्यांचा रोष होता. रावळपिंडी एक्स्प्रेस समजल्या जाणाऱ्या पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर यानेही आपल्या नेहमीच्या खुमासदार शैलीत पाकिस्तानच्या संघावर ताशेरे ओढले होते. त्याने सरफराजला ‘बिनडोक’ कर्णधार म्हटले होते.

Leave a Comment