विधानसभा निवडणुकीपूर्वी एमआयएम-वंचित बहुजन आघाडीचा घटस्फोट


औरंगाबाद – आगामी विधानसभा निवडणूक लोकसभेत एकत्र निवडणूक लढवणारे वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएम वेगळे लढणार असल्याचे प्रसिद्धी पत्रक काढून एमआयएमने स्पष्ट केले आहे. विधानसभा निवडणुकीत एमआयएमला वंचित बहुजन आघाडीने आठ जागा दिल्याने आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय एमआयएमने घेतला आहे.

विधानसभा निवडणुकीत सुरुवातीला 98 जागांची मागणी एमआयएम पक्षाने केली होती. पण नंतर यादीत सुधार करून 76 जागा देण्याची मागणी एमआयएमने केली होती. एमआयएमने त्यापेक्षा आणखी काही जागा सोडण्याची तयारी केली होती. पण एमआयएमच्या ताब्यात असलेली औरंगाबाद मध्यची जागा वगळून वंचितने आठ जागा देऊ केल्यामुळे हे जागावाटप मंजूर नसल्याने एमआयएमने अखेर आघाडीतून माघार घेतली आहे. वंचित आणि एमआयएममध्ये गेल्या काही दिवसांपासून जागावाटपाचा पेच सुटत नव्हता. जागावाटप आधी करून घ्या असा आग्रह एमआयएम पक्षातर्फे करण्यात होता. तर दुसरीकडे वंचितने राज्यभर प्रत्येक मतदार संघात आपल्या उमेदवारांची चाचपणी सुरू केली होती. त्यामुळे एमआयएमची चिंता वाढत असल्याचे स्पष्ट दिसून येत होते.

आपल्या पदाधिकाऱ्यांसोबत अनेक वेळा एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष खासदार इम्तियाज जलील यांनी वंचित सोबत बोलणी केली. त्याचबरोबर वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर आणि एमआयएमचे अध्यक्ष असूद्दीन ओवेसी यांच्यात काही दिवसांपूर्वी पुण्यात बंद दाराआड चर्चा देखील झाल्यामुळे जागा वाटपाचा तिढा सुटेल असे वाटत होते. पण एमआयएमचा जागावाटपाचा प्रस्ताव वंचित आघाडीने फेटाळत अवघ्या आठ जागा दिल्याने आघाडीतुन वेगळे होण्याचा निर्णय एमआयएमने घेतला आहे. 2014 मध्ये 24 जागांवर एमआयएम पक्ष लढला होता. त्यापैकी दोन जागांवर त्यांनी विजय मिळवला होता. त्यानंतर पक्षाची ताकद वाढली आहे. राज्यात शंभरहून अधिक नगरसेवक असल्यामुळे किमान 50 जागा मिळतील अशी अपेक्षा होती. पण तसे न झाल्याने आघाडीतून बाहेर पडत असल्याचे एमआयएमने प्रसिद्धी पत्रक काढून कळवले आहे. त्याचबरोबर प्रकाश आंबेडकर यांचा आदर करत होतो आणि करत राहू असे देखील पत्रात नमूद करत त्यांच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्यात.

वंचितकडून गेल्या काही दिवसांपासून काँग्रेससोबत बोलणी चालू आहे. वंचित आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेससोबत निवडणूक लढवण्यासाठी 50 – 50 फॉर्म्युला देऊ शकते, अशी चर्चा आता रंगली असल्यामुळेच वंचितने आपल्या आघाडीत एमआयएमला कमी जागा देऊ केल्या होत्या. अशी शक्यता वर्तवली जात आहे.

Leave a Comment