बँकांचे हे 7 नियम बदलणार 1 सप्टेंबरपासून


पुढील महिन्याच्या 1 तारखेपासून बँकेशी संबंधित काही नियम बदलणार असून बँकांकडून एका बाजुला घर खरेदीसाठी कर्ज स्वस्तात उपलब्ध करून दिले जात आहे तर दुसरीकडे बँकांची वेळ देखील बदलणार आहे. याशिवाय बँकेच्या आणखी काही नियमांमध्ये बदल होणार आहे.

गृहकर्ज स्टेट बँक ऑफ इंडियाने स्वस्तात उपलब्ध करून दिले आहे. गृह कर्जाच्या व्याज दरात त्यांनी 0.20 टक्क्यांची कपात केली आहे. हा नियम 1 सप्टेंबरपासून लागू करण्यात येणार आहे.

1 सप्टेंबरपासून सरकारी बँकेकडून 59 मिनिटांत कर्ज उपलब्ध होणार आहे. गृहकर्ज, वाहन कर्जाचा यामध्ये समावेश आहे. ही सुविधा ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्सने ‘psbloansin59minutes’ वर सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे.

पेटीएम, फोन पे, गुगल पे मोबाईलवरून वापरण्यासाठी 31 ऑगस्टपर्यंत केवायसी पूर्ण करणे गरजेचे आहे. तसे केले नाही तर तुमचे मोबाईल वॉलेट 1 सप्टेंबरपासून बंद होईल. यासाठी रिझर्व बँक ऑफ इंडियाने 31 ऑगस्टपर्यंत मुदत दिली होती.

1 सप्टेंबरपासून बँक ऑफ महाराष्ट्रचे कर्जही स्वस्त होणार आहे. रिटेल लोनला त्यांनी रेपो रेटशी जोडण्याचा निर्णय घेतला असल्यामुळे आरबीआय रेपो रेटमध्ये ज्या ज्या वेळी बदल करेल तेव्हा कर्जाच्या व्याज दरातही बदल होईल.

शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारने बँकेमधून किसान क्रेडिट कार्ड 15 दिवसांत तयार करून देण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशाची अंमलबजावणी 1 सप्टेंबरपासून होणार असल्यामुळे किसान क्रेडिट कार्ड देखील शेतकऱ्यांना लवकरात लवकर मिळेल.

रिटेल फिक्स्ड डिपॉझिट आणि बल्क डिपॉझिटच्या व्याज दरात एसबीआयने कपात केली आहे. 1 लाख रुपयांपर्यंत डिपॉझिट करणाऱ्या ग्राहकांना 3.5 टक्के व्याज मिळेल तर त्यापेक्षा जास्त रकमेवर 3 टक्के व्याज मिळेल. रिटेल टर्म डिपॉझिटच्या दरात बँकेने 0.1 टक्के ते 0.5 टक्क्यांपर्यंत कपात केली आहे तर बल्क डिपॉझिट रेटमध्ये 0.3 टक्के ते 0.7 टक्के कपात केली आहे.

सध्या सकाळी 10 वाजता बँकेच्या कामकाजाची वेळ आहे. पण ही वेळ आता बदलण्याची शक्यता आहे. अर्थ मंत्रालयाने बँक सकाळी 9 वाजता उघडण्याचा प्रस्ताव दिला आहे. हा नियम जर लागू झाला तर सकाळी ऑफिसला जाणाऱ्या कर्मचाऱ्यांना त्यांचे बँकेतील काम आटोपून जाता येईल.

Leave a Comment