एटीएममधून एवढी रक्कम काढण्यासाठी आता ओटीपी आवश्यक


नवी दिल्ली – सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनीही एटीएमच्या माध्यमातून होणारे फसवणुकीचे प्रकार रोखण्यासाठी आता आवश्यक ती पावले उचलण्यास सुरूवात केली असून एटीएमच्या माध्यमातून होणारे फसवणुकीचे प्रकार गेल्या काही महिन्यांमध्ये वाढल्यानंतर सर्व बँकांना याबाबत योग्य ती पावले उचलण्याचे आदेश भारतीय रिझर्व्ह बँकेने दिले होते. कॅनरा बँकेने आता 10 हजार रूपयांपेक्षा अधिक रोकड एटीएमच्या माध्यमातून काढण्यासाठी पिन क्रमांकासहित मोबाइलवर आलेला ओटीपी टाकणेही बंधनकारक केले आहे.

दरम्यान, अन्य बँकाही लवकरच कॅनरा बँकेसारखी पावले उचलू शकतात, अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली. रात्री 11 ते सकाळी 6 च्या दरम्यान एटीएममधून फसवणुकीचे प्रकार हे अधिक होतात. आम्हाला रिझर्व्ह बँकेच्या सर्व आदेशांचे पालन करावे लागणार आहे. तसेच रिझर्व्ह बँकेने एटीएममधून होणारे फसवणुकीचे प्रकार थांबवावे असे स्पष्ट केल्याची माहिती, स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

यापूर्वी दिल्ली स्टेट लेव्हल बँकर्स कमिटीने (SLBC) एटीएममधील फसवणुकीचे प्रकार रोखण्यासाठी काही उपाय सुचवले होते. एटीएमच्या दोन ट्रान्झॅक्शनदरम्यानचा कालावधी हा 6 ते 12 तासांचा असावा, असा पर्याय त्यांनी सुचवला होता. दिल्लीत 2018-19 मध्ये एटीएममधून फसवणुकीची 179 प्रकरणे समोर आली होती. तर महाराष्ट्रातूनही 233 प्रकरणे समोर आली होती. एटीएम कार्डच्या क्लोनिंगचीही प्रकरणे काही महिन्यांपूर्वी समोर आली होती. यामध्ये मोठ्या प्रमाणात परदेशी नागरिकांचा समावेश होता.

Leave a Comment