भोपाळ – पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य भाजप खासदार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी केले आहे. एकामागे एक भाजपच्या अनेक नेत्यांचे मृत्यू होत आहेत. यामागे काळ्या मारक शक्तींचा वापर विरोधी पक्ष करत आहेत, हे एक कारण असल्याचे साध्वींनी म्हटले आहे. भाजपच्या प्रदेश कार्यालयात आयोजित दिवंगत बाबूलाल गौर आणि माजी अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या श्रद्धांजली सभेदरम्यान त्या बोलत होत्या.
एका महाराजांनी लोकसभा निवडणूक लढवत असताना विरोधी पक्ष मारक शक्तीचा प्रयोग करत असल्याचे सांगितले होते, असेही प्रज्ञा सिंह यांनी म्हटले आहे. भाजप नेत्यांवर विरोधी पक्षाद्वारे मारक शक्तीचा वापर केला जात असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला. अकाली आमच्या नेत्यांचे निधन होत आहे. ही बाब संशय निर्माण करणारी आहे. मारक शक्तींचा वापर विरोधी पक्षांनी केला असल्याचे साध्वी म्हणाल्या. एका महाराजांनी मी लोकसभा निवडणूक लढवत असताना हे सांगितले. तसेच, त्यांनी खूप वाईट काळ सुरू असल्याचेही म्हटले होते, असे त्या म्हणाल्या.
तुमच्या आणि तुमच्या पक्षातील लोकांविरोधात विरोधी पक्ष एका मारक शक्तीचा वापर करत आहे. तुम्ही सर्वजण सावध रहा. तुमची साधना वाढवा. खरे,तर ही गोष्ट मी विसरून गेले होते. पण, आता आमच्या पक्षातील नेते एकामागून एक जात असल्याचे दिसत आहे. त्या महाराजांच्या शब्दांची आता मला आठवण होते. भलेही तुम्ही विश्वास ठेवणार नाही. पण हे खरे आहे आणि असेच होत असल्याचे साध्वींनी म्हटले आहे.