मुंबई : आता महाराष्ट्रातील राजकीय आखाड्यात उतरण्याचा निर्णय दिल्लीच्या सत्तेवर असणाऱ्या आम आदमी पक्षाने घेतला आहे. आम आदमी पक्षाने शुक्रवारी महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणूक लढवणार असल्याची घोषणा केली. पक्षनेतृत्त्वाने निवडणुकीतील उमेदवारांच्या निवडीसाठी राज्यात निवडणूक समितीची स्थापनाही केली आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक लढवणार ‘आप’
‘आप’ या निवडणुकीत अनेक जागांवर आपले उमेदवार उतरवणार आहे आणि महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अरविंद केजरीवालसह अनेक नेते प्रचारही करणार आहेत. अनेक मुद्द्यांवर महाराष्ट्र सरकार सपशेल अपयशी ठरली आहे, अशा परिस्थितीत संकटग्रस्त नागरिकांच्या हितासाठी निवडणुकीच्या मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला असल्याची घोषणा आम आदमी पक्षाने केली.
महाराष्ट्रातील पक्षाचे प्रभारी दुर्गेश पाठक यांनी पक्षाच्या निर्णयाची माहिती देताना भाजप आणि शिवसेना युती सरकारवर निशाणा साधला. तत्कालीन काँग्रेस सरकारला कंटाळून पाच वर्षांपूर्वी नागरिकांनी परिवर्तनासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वाखालील भाजप सरकारला बहुमत दिले होते. पण सर्व मुद्द्यांवर हे सरकारही अपयशी ठरले असल्याचे दुर्गेश पाठक म्हणाले.
दुर्गेश पाठक म्हणाले की, राज्यातील लोकांना एक मजबूत पर्याय देण्याच्या दिशेत आम आदमी पक्ष काम करेल आणि याच उद्देशाने राज्यात पूर्ण तयारीनिशी विधानसभा निवडणुकीत सहभागी होईल. आम आदमी पक्षाने निवडणुकीच्या तयारीसाठी एका समितीचीही स्थापन केली आहे.
येत्या दोन महिन्यात महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक होत आहे. शिवसेना आणि भाजप या निवडणुकीत एकत्रित लढणार आहेत. तर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि इतर प्रादेशिक पक्षही जोरदार तयारी करत आहेत. आता यात आम आदमी पक्षाचाही समावेश होणार आहे. आम आदमी पक्षाने याआधी हरियाणा, पंजाब आणि गोव्यात विधानसभा निवडणूक लढवली होती, परंतु तिन्ही राज्यात पक्षाला विशेष यश मिळाले नव्हते.