राष्ट्रीय पुरस्कारानंतर आयुष्मानाचा भाव वधारला


आपल्या चित्रपटांमध्ये दर्जेदार भूमिका साकारून प्रेक्षकांची मने जिंकणारा अभिनेता आयुष्मान खुराणाला नुकताच त्याच्या अंधाधुंध या चित्रपटातील भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. हा पुरस्कार मिळाल्यानंतर आयुष्मानने आपल्या मानधनात चांगलीच वाढ केली आहे. यासंदर्भातील वृत्त मिड डे या वर्तमानपत्राने दिले असून त्यांनी दिलेल्या वृत्तानुसार, आयुष्मानने जाहिरातींसाठी तिप्पटहून अधिक मानधन वाढवलं आहे.

एका जाहिरातीसाठी तो आता साडेतीन कोटी रुपये आकारतो. त्याने नुकतेच मलबार हिल येथील बंगल्यात एका जाहिरातीसाठी शूटिंग केले. आयुष्मानची टीम यावेळी साडेतीन कोटींहून कमी मानधन घेण्यास नकार देत होती. तो याआधी एका जाहिरातीसाठी ९० लाख रुपये ते एक कोटीपर्यंत मानधन घेत होता. त्यामुळे आता आगामी चित्रपटांसाठीही त्याचे मानधन वाढणार असल्याची शक्यता आहे.

‘अंधाधून’, ‘बधाई हो’, ‘आर्टिकल १५’ अशा दमदार चित्रपटांमध्ये आयुष्मानने भूमिका साकारल्या. बॉक्स ऑफीसवर या चित्रपटांनी चांगली कमाई केली. तो आता ‘ड्रीम गर्ल’ या चित्रपट आणखी एका अनोख्या भूमिकेत दिसणार आहे. ‘ड्रीम गर्ल’नंतर आयुष्मान ‘शुभ मंगल फिर से सावधान’ या चित्रपटात झळकणार आहे.

Leave a Comment