
कराची – काश्मीरमधून कलम ३७० हटवण्याचा निर्णय केंद्रातील मोदी सरकारने घेतला. मोदी सरकारचा हा निर्णय पाकिस्तानच्या फार जिव्हारी लागल्यामुळे पाकिस्तानच्या पंतप्रधानांपासून अनेक क्रिकेटपटूंनी या निर्णयावर प्रतिक्रिया दिली. आणखी एका खेळाडूची यात आता भर पडली आहे. याविषयी पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू जावेद मियांदादने अशी गरळ ओकली आहे.
मियांदाद बरळला, अणुबॉम्बचा वापरुन भारताचा क्षणात नायनाट करु
जावेद मियांदाद याने पाकिस्तानी वृत्तवाहिनीशी बोलताना, सर्व हद्दी पार करून आम्ही भारतावर हल्ला करू, अशी धमकी दिली. तसेच भारत हा भित्रा देश असून त्यांना घाबरण्याची गरज नसल्याची मुक्ताफळे त्याने उधळली आहेत.
भारताचे पंतप्रधान नरेंद्र यांना काय सल्ला देणार असे जेव्हा मियांदादाला विचारले असता, अनेक वेळा मी सांगितले आहे की भारत भित्रा देश असून आतापर्यंत त्यांनी काही केलेले नाही. आम्ही अणुबॉम्ब असे ठेवलेले नाही. संधी मिळाली तर भारतावर आम्ही याचा वापर करु, असे भडकाऊ विधान केले. दरम्यान, ३७० कलम हटवल्याने पाकिस्तानच्या अनेक खेळाडूंनी प्रतिक्रिया दिली आहे. यात प्रामुख्याने, शाहीद आफ्रिदी, शोएब अख्तर, सरफराज अहमद यांचा समावेश आहे.
