करण जोहरने दिले ‘कुछ कुछ होता है’च्या सिक्वेलचे संकेत


बॉलीवूडचा प्रसिद्ध निर्माता-दिग्दर्शक करण जोहर याने आपल्या करिअरमधील सुपरहिट ठरलेल्या ‘कुछ कुछ होता है’ या चित्रपटाचा सिक्वेल बनणार असल्याचे संकेत दिले आहेत. या चित्रपटाची तरुणाईमधील क्रेझ पाहता, जर या चित्रपटाचा सिक्वेल बनवला तर त्यालाही प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळेत, असे करण जोहरने म्हटले आहे.

‘कुछ कुछ होता है’ चित्रपटात शाहरुख खान, राणी मुखर्जी आणि काजोल यांची केमेस्ट्री पाहायला मिळाली. आता सिक्वेलमध्ये कोणते कलाकार झळकणार याबाबतही काही नावे समोर आली आहेत. करण जोहरला याबाबताच प्रश्न मेलबर्न येथे विचारण्यात आला होता. या चित्रपटाचा सिक्वेल बनवणे ही माझी इच्छा आहे. सिक्वेल जर तयार झालाच, तर रणवीर सिंग यामध्ये ‘राहुल’च्या भूमिकेत असेल. तर, ‘अंजली’ आलिया भट्ट आणि ‘टीना’च्या रूपात जान्हवी कपूर झळकेल, असेही करण जोहरने सांगितले. त्याने पुढे ‘कुछ कुछ होता है’ चित्रपटाच्या काही मजेशीर आठवणी देखील सांगितल्या.

मी शाहरुख आणि काजोलकडे जेव्हा या चित्रपटासाठी बोलायला गेलो होतो, त्यांना तेव्हा फक्त एकाच सिनची माहिती दिली होती. तेव्हा माझ्याकडे चित्रपटाची स्क्रिप्ट पूर्ण नसल्यामुळे त्यांना मी म्हणालो होतो, की तुम्हाला जर एक सिन आवडला तर, मी तुम्हाला पूर्ण चित्रपटाचे वर्णन करुन सांगेल. हे सर्व खोटे होते. तरीही शाहरुख आणि काजोलने माझ्यावर विश्वास ठेवला’, असेही तो म्हणाला.

तब्बू, उर्मिला, ऐश्वर्या यांनाही या चित्रपटासाठी सुरुवातीला विचारण्यात आले होते. यापैकी फक्त ऐश्वर्यांने त्याला फोन करुन नकार कळवला होता. पुढे आदित्य चोप्राने राणी मुखर्जीचे नाव सुचवल्याने राणीला चित्रपटात संधी मिळाली. हा चित्रपट १९९८ साली रिलीज झाला होता. शाहरुख, काजोल आणि राणीची या चित्रपटातील भूमिका आजही चाहत्यांच्या मनात रुजलेली आहे. तर, या चित्रपटात सलमान खाननेही स्पेशल भूमिका साकारली होती. या चित्रपटासाठी त्याला पुरस्कारही मिळाला होता.

Leave a Comment