… तर भापजने काश्मीरमधील कलम ३७० हटवले असते का?


नवी दिल्ली – माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम यांनी काश्मीरमध्ये हिंदू बहुसंख्य असते तर भाजपने कलम ३७० हटवले असते का? असा सवाल विचारला आहे. केंद्रातील मोदी सरकारने जम्मू काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम ३७० हटवण्याचा निर्णय घेतला. पी चिदंबरम यांनी या निर्णयाचा विरोध दर्शवत भाजपवर टीका केली आहे. त्याचबरोबर जम्मू काश्मीर मध्ये बहुसंख्य हिंदू असते तर भाजपने कधीही कलम ३७० हटवले नसते असे त्यांनी म्हटले आहे. जम्मू काश्मीर हे अस्थिर आणि अशांत आहे. मात्र भारतीय मीडिया त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोपही चिदंबरम यांनी केला.

सध्याच्या घडीला काश्मीरची परिस्थिती निवळली असल्याचे दाखवले जात आहे, पण सत्यात तसे काहीच नाही. काश्मीरमध्ये जी अशांत स्थिती भारतीय मीडिया दाखवत नसेल तर याचा अर्थ तिथे सारे काही आलबेल असल्याचे होत नाही असेही चिदंबरमने म्हटले आहे. भाजपबाबत विरोधी पक्षांमध्ये भीती असल्यामुळे कलम ३७० हटवण्यास फारसा विरोध झाला नसल्याचेही चिदंबरम यांनी म्हटले आहे. बीजेडी, तृणमूल काँग्रेस, जद (यू), वायएसआर काँग्रेस, टीआरएस या पक्षांनी आम्हाला सहकार्य केले नाही कारण ते भाजपला घाबरत असल्याचेही चिदंबरम यांनी म्हटले आहे.

Leave a Comment