पूरग्रस्तांच्या मदतीला धावले साईबाबा, १० कोटींची केली मदत


अहमदनगर : महापुराने पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली आणि सातारा येथे हाहाकार माजला असून शिर्डी येथील श्री साईबाबा संस्‍थान विश्‍वस्‍त यांच्याकडून पूरग्रस्तांच्या मदतीसाठी १० कोटी रुपयांचा निधी देण्यात येणार आहे. साईबाबा संस्थानने त्यासाठी १० कोटींची आर्थिक मदत देण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच डॉक्टरांची टीम आणि औषधे उपलब्ध करुन देणार आहेत, अशी माहिती ट्विटरच्या माध्यमातून संस्‍थानचे अध्‍यक्ष डॉ. सुरेश हावरे यांनी दिली आहे.

मुसळधार पावसामुळे राज्‍यामध्‍ये भीषण पूरपरिस्थिती निर्माण झालेली आहे. विशेषत: पश्चिम महाराष्‍ट्रातील कोल्‍हापूर, सांगली, सातारा या जिल्‍ह्यातील जनजीवन या जलप्रलयाच्‍या थैमानामुळे विस्‍कळीत झाले आहे. हजारो नागरिक यामुळे बेघर झाले असून अनेक गावेही उध्‍वस्‍त झालेली आहेत.


साईबाबा संस्‍थान विश्‍वस्‍त व्‍यवस्‍था, शिर्डीच्‍यावतीने ही नैसर्गिक आपत्‍ती भीषण असून आपले राष्‍ट्रीय कर्तव्‍य समजून या पुरग्रस्‍तांसाठी १० कोटी रुपयांचा निधी देण्‍याचा निर्णय घेण्‍यात आला आहे. न्‍यायालयीन प्रक्रियेस हा निधी अधिन राहुन मुख्‍यमंत्री सहाय्यता निधीस देण्‍यात येणार आहे. संस्‍थानाच्यावतीने परिस्‍थिती बघून वैद्यकीय पथक आणि औषधेही पाठविण्यात येणार आहे. पुरग्रस्‍तांच्‍या मदतीसाठी राज्‍य शासन अहोरात्र परिश्रम घेत आहे. राज्‍यात आलेली ही आपत्‍ती मोठी असून डॉ. हावरे यांनी या आपत्‍तीतुन बाहेर पडण्‍यासाठी श्री साईबाबांच्‍या चरणी प्रार्थना करीत असल्‍याचे सांगितले.

Leave a Comment