ऋषभ पंतच्या खेळीवर विराट कोहलीची स्तुतीसुमने


टीम इंडियाने गयाना येथे खेळवण्यात आलेल्या अखेरच्या टी-२० सामन्यातही वेस्ट इंडिजवर ७ गडी राखून मात केली आहे. भारताच्या विजयात कर्णधार विराट कोहली आणि यष्टीरक्षक ऋषभ पंत यांनी अर्धशतकी खेळी करत मोलाचा वाटा उचलला. ऋषभ पंत पहिल्या दोन सामन्यांमध्ये पूर्णपणे अपयशी ठरला होता. पण ऋषभने तिसऱ्या सामन्यात दमदार पुनरागमन करत, नाबाद ६५ धावांची खेळी केली. भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली त्याच्या या खेळीमुळे चांगलाच प्रभावित झाला आहे.

आम्ही भारताचे भविष्य म्हणून ऋषभ पंतकडे पाहत आहोत. तो गुणवान खेळाडू आहे. त्याला सध्या अधिकाधिक खेळण्याची संधी दिली गेली पाहिजे, त्याच्यावर दबाव टाकणे योग्य ठरणार नाही. तुम्हाला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दबाव हाताळता आला पाहिजे. असाच तो खेळत राहिला, तर भारताकडून त्याचे भविष्य उज्वल असेल यात शंका नसल्याचे म्हणत ऋषभचे विराटने तोंडभरुन कौतुक केले.

भारताचा हा मालिका विजय आगामी टी-२० विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर आशादायी आहे. विशेष म्हणजे निवड समितीने विश्वचषकातील पराभवानंतर यापुढे ऋषभ पंत यष्टीरक्षक म्हणून पहिली पसंती असेल हे स्पष्ट केले होते. भारतीय संघ टी-२० मालिकेतील विजयानंतर आता ८ ऑगस्टपासून विंडीजविरुद्ध वन-डे मालिका खेळणार आहे. त्यामुळे या मालिकेत पंत कशी खेळी करतो हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Leave a Comment