कलम ३७०; बॉलीवूड निर्मात्यांचा लाडका आतिफ असलम देखील बरळला


केंद्रातील मोदी सरकारकडून जम्मू आणि काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम ३७० रद्द करण्यात आल्यानंतर संतापाचे वातावरण सध्या पाकिस्तानमध्ये असून भारताचा हा निर्णय कशा पद्धतीने चुकीचा आहे हे सांगण्याचा प्रयत्न पाकिस्तानकडून केला जात आहे. तर काश्मीरचा मुद्दा संयुक्त राष्ट्राकडे नेणार आहोत असा दावा काही पाकिस्तानी करत आहेत. भारतावर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्यापासून ते सामान्यांपर्यंत सगळेचजण टीका करत आहेत. आता यात भारतात राहून आपले पोट भरणाऱ्या गायक आतिफ असलमचाही समावेश झाला आहे.

मंगळवारी हज यात्रेसाठी आतिफ असलम रवाना झाला. यात्रेला रवाना होण्यापूर्वी काश्मीरसंबंधी एक वक्तव्य आतिफ असलमने केल्यामुळे त्याच्यावर भारतीय नेटकरी टीका करत आहेत. अनेक भारतीयांनी भारतात राहून आपले पोट भरणाऱ्या आतिफ असलमने खरा रंग दाखवल्याचे म्हटले आहे.

फेसबुक पोस्ट करत आपण हज यात्रेला जात असल्याची माहिती आतिफ असलमने दिली. त्याने यावेळी लिहिले आहे की, ही पोस्ट तुमच्यासोबत शेअर करताना मला खूप आनंद होत आहे. लवकरच आयुष्यातील सर्वात महत्त्वाच्या प्रवासासाठी निघत आहे. मी हजला जाण्याआधी तुम्हा सर्वांची माफी मागतो. मग ते माझे चाहते असोत की कुटुंबीय किंवा मित्र. मी कोणाच्या भावना जर दुखावल्या असतील तर मला माफ करा. आतिफ असलमने पुढे लिहिले आहे की, त्याचबरोबर मी काश्मिरींसोबत होत असलेला अत्याचार आणि शोषणाचा निषेध करतो. काश्मीर आणि जगातील सर्व निष्पापांची अल्लाह रक्षा करो. भारतीय आतिफ असलमच्या या पोस्टवर नाराज असून त्याच्यावर टीका करत आहेत.

Leave a Comment