आता न घाबरता काश्मिरी गोऱ्या मुलींसोबत लग्न करा; भाजप आमदाराचे वादग्रस्त वक्तव्य


मुजफ्फरनगर – आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असणारे भाजप आमदार विक्रम सिंह सैनी यांनी कलम 370 हटवल्यानंतर पुन्हा एकदा वादग्रस्त प्रतिक्रिया दिली आहे. या निर्णयामुळे देशातील मुस्लिमांना आनंद व्हायला हवा कारण त्यांना आता न घाबरता काश्मिरी गोऱ्या मुलींसोबत लग्न करता येणार असल्याचे विक्रम सिंह सैनी यांनी म्हटले आहे. त्याचबरोबर तर काश्मीरला जाऊन भाजपच्या अविवाहित युवा नेतेही प्लॉट विकत घेऊ शकतील आणि लग्न करु शकतील असे वक्तव्य या भाजपच्या आमदार महाशयांनी केले आहे.

मुजफ्फरनगरच्या कार्यक्रमात बोलताना भाजप आमदार विक्रम सिंह सैनी म्हणाले की, मोदी यांनी आपल्या सगळ्याचं स्वप्न साकार केलं आहे. भाजपचे अविवाहित नेते आहेत त्यांना काश्मीरला जाऊन लग्न करता येईल यात आमची कोणतीही अडचण नाही. भाजपच्या मुस्लीम कार्यकर्त्यांनाही काश्मीरच्या गोऱ्या मुलींसोबत लग्न करता येईल असं त्यांनी सांगितले.

भाजप कार्यकर्ते कठौली येथे कलम 370 हटविण्याच्या मोदी सरकारच्या ऐतिहासिक निर्णयावर जल्लोष करण्यासाठी जमले होते. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून सैनी उपस्थित होते. त्यांनी हे वादग्रस्त वक्तव्य या कार्यक्रमात केले. सैनी यांनी यापूर्वीही एका कार्यक्रमात बोलताना भारतात राहायला ज्यांना भीती वाटत असेल अशांना बॉम्बने उडविले पाहिजे तसेच त्यांनी देश सोडून जायला हवे असे वादग्रस्त वक्तव्य केले होते.


जम्मू काश्मीरमधून कलम 370 रद्द करण्याचा ऐतिहासिक निर्णय सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतला. तसेच जम्मू काश्मीर पूनर्रचना विधेयक आणून त्या राज्याला केंद्रशासित राज्य म्हणून जाहीर केले. तसेच लद्दाख हे स्वतंत्र केंद्रशासित राज्य निर्माण करण्यात आले. जम्मू काश्मीरमध्ये विधानसभा अस्तित्वात असेल तर लद्दाखमध्ये विधानसभा अस्तित्वात नसेल, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडून सांगण्यात आले. देशभरात भाजप कार्यकर्त्यांनी कलम 370 हटविल्यानंतर जल्लोष केला. सर्वच स्तरातून पंतप्रधान नरेंद मोदी यांनी घेतलेल्या धाडसी निर्णयावर कौतुकाचा वर्षाव केला गेला. मात्र या निर्णयावरुन काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीकास्त्र सोडले.

Leave a Comment