अजून काही बडे नेते आमच्या संपर्कात – गिरीश महाजन


जळगाव – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ‘महाजनादेश’ यात्रा ७ ऑगस्टला जळगाव जिल्ह्यात दाखल होणार असून याबाबत माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी आजमितीस काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील ८३ पैकी १५ ते २० आमदार आपल्या पक्षांमध्ये राहायला तयार नाहीत. या दोन्ही पक्षातील तब्बल ५० पेक्षा अधिक आमदार सद्यास्थितीत आमच्या संपर्कात असल्याचा दावा, केला आहे.

मुख्यमंत्री फडणवीस यांची महाजनादेश यात्रेदरम्यान जामनेर, जळगाव, भुसावळ येथे जाहीर सभा होणार असून, त्याची पूर्वतयारी सुरू असल्याचे महाजन यांनी सांगितले. भाजपच्या मेगा भरतीविषयी यावेळी पत्रकारांनी विचारणा केली असता ते म्हणाले की, भाजपमध्ये प्रवेशासाठी विरोधी पक्षातील १०० टक्के आमदार आग्रही आहेत. पण आम्ही सगळ्यांना युती असल्याने सामावून घेऊ शकत नाही. कोणाला पक्षात घेतले तरच निवडून येऊ, अशी देखील परिस्थिती आता भाजपची राहिलेली नाही.

मला दोन वेळा राष्ट्रवादी काँग्रेसचे माजीमंत्री गुलाबराव देवकर भेटले. मला विधानपरिषदेचे माजी आमदार मनीष जैन देखील भेटून गेले आहेत. धुळ्याचे आमदार कुणाल पाटील हे तर मला पक्षात घ्या म्हणून मागे लागलेले आहेत. मात्र, लोकसभा निवडणुकीत त्यांना स्वतःच्या मतदारसंघात १ लाखाहून अधिक मतांची पिछाडी होती. मी त्यांना लोकसभेवेळीच भाजपमध्ये येण्यास सांगितले होते. पण तेव्हा त्यांनी ऐकले नाही. आता त्यांना घेणे शक्य नाही. येत्या दोन दिवसात जिल्ह्यात येणाऱ्या महाजनादेश यात्रेत कोण कोण भाजपवासी होईल? याचे चित्र स्पष्ट होईल, असे महाजन यांनी सांगितले.

Leave a Comment