सध्या सोशल मीडिया आणि प्रसार माध्यमांमध्ये एक सरकारी महिला अधिकार खूपच चर्चेत आहे. पण तिने काही चांगले काम केले म्हणून नव्हे तर तिच्या वेगळ्या कारनाम्यामुळे ती चर्चेत आली आहे. ही महिला अधिकारी राजस्थानमधील उदयपुरमध्ये आदिवासी विभागात आर्थिक सल्लागार पदावर कार्यरत असून तिच्या घरी आणि कार्यालयावर काही दिवसांपूर्वीच लाचलुचपत विभागाने छापे टाकले आणि त्यानंतर जे काही घडले त्यामुळे सगळेच बुचकुळ्यात पडले.
भारती राज यांच्या लाचलुचपत विभागाने निरनिराळ्या सात ठिकाणी घरावर आणि कार्यालयावर छापे टाकले. यामध्ये त्यांच्या चार बँक खात्यात 1.03 कोटी रूपये, एक 500 चौरस मीटरचा प्लॉट, तीन मजली हॉटेल, तसेच एका मोठ्या परिसरात दोन मोठी शोरूम असल्याची माहिती समोर आली. याव्यतिरिक्त या छाप्यातून तीन सरकारी बँकांमध्ये चार लॉकरही असल्याचे समोर आले आहे.
लाचलुचपत विभागाने त्यांच्या वडिलांच्या घराचीही त्याचबरोबर झडती घेतली. त्यादरम्यान, 92 लाखांची एफडी, दोन दुकाने, दोन प्लॉट, 8 बँक खाती, उत्तर प्रदेशात जमीन असल्याची माहितीही समोर आली. तसेच लाचलुचपत विभागाने त्यांच्या वडिलांकडून 50 लाख रूपयांच्या परदेशी गुंतवणुकीची कागदपत्रे आणि 250 डॉलर्स, तसेच 50 युरोही जप्त करण्यात आले.
भारती यांनी गेल्या 10 वर्षांमध्ये 21 देशांचे दौरे केल्याची माहिती तपासादरम्यान, समोर आले आहे. स्वित्झर्लंड, जपान, इटली, फ्रान्स, न्यूझीलंडसारख्या देशांचा यामध्ये समावेश असून यादरम्यान त्यांनी 20 लाखांपर्यंतचा खर्च केला असल्याची कागदपत्रेही सापडली आहेत. तर त्यांच्या एका बँकेतील लॉकरमध्ये 30 लाख रूपयांची सोन्याचे आणि हिऱ्याचे दागिनेही सापडले असल्याची माहिती लाचलुचपत विभागाचे महासंचालक अलोक त्रिपाठी यांनी दिली.