शिवेंद्रराजेंच्या वक्तव्याचा राजमाता कल्पनाराजे यांनी घेतला समाचार


सातारा – नुकतेच भाजपमध्ये दाखल झालेले राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी माझा काटा काढायचा प्रयत्न झाल्यास काट्याने काटा काढू, असा अप्रत्यक्ष इशारा विरोधकांना दिला होता. याला उत्तर देताना राजमाता कल्पनाराजे भोसले यांनी काट्याने काटा काढायला आम्ही काय मेलेल्या आईचे दूध पिलो आहे का? असे वक्तव्य करत आमदार शिवेंद्रराजे यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला.

तुमच्या वडिलांना व तुम्हाला नेतृत्वाची संधी ज्या शरद पवार साहेबांनी व त्यांच्या पक्षाने ४० वर्षापेक्षा अधिक काळ दिली. उतारवयात त्या पवारांना फसवून तुम्ही गद्दारी केली आहे. तुम्हाला गद्दारीचा हा इतिहास नवा नाही आणि तरीही काट्याने काटा काढायची भाषा तुम्ही करता? आम्ही काट्याने काटा काढायला काय मेलेल्या आईचे दूध पिलो आहे का? याद राखा असली भाषा जर पुन्हा कराल तर येणाऱ्या निवडणुकीत कुणाचा काटा निघेल हे तुम्हाला समजेलच, असे म्हणत कल्पनाराजे यांनी शिवेंद्रराजेंवर टीका केली.

त्या पुढे म्हणाल्या, शिवेंद्रराजे तुम्ही जरा इतिहास तपासून घ्या, जुन्या गोष्टी आठवा. जे काही तुम्हाला व तुमच्या वडिलांना मिळाले ते आमच्यामुळे हे तुम्ही एवढ्या लवकर विसरता. तुमच्या वडिलांनी सतीश जाधव यांना १९९६ ला उदयनराजेंकडे पाठवले. आमदारकीला मला मदत करा, तुम्हाला मी खासदारकीला मदत करतो, असा शब्द अभयसिंहराजेंनी दिला. मात्र, तो न पाळता अभयसिंहराजेंनी आमदारकीला उदयनराजेंचा उपयोग करुन घेतला आणि खासदारकीला त्यांना फसवले. त्यामुळेच जाधव तुम्हाला तुटले. उदयनराजेंना अनेकदा अभयसिंहराजेंनी फसवले. तुम्ही तीच परंपरा पुढे चालवत आहात.

तुमच्या पत्नीचा नगरपालिकेच्या निवडणुकीत झालेला पराभव आजही तुम्हाला झोंबतो. मग १९९९ साल तुम्ही कसे विसरता? आणि आम्हाला कसे विसरायला लावता? तुम्हाला विचारुन राजवाड्याच्या बाहेर पडायचे का? मी नेहमीच सातारा जिल्ह्याच्या सामाजिक वाटचालीत लोकांबरोबर राहिले आहे. मी यापूर्वीही अनेकदा शरद पवार यांच्यासह मोठ्या राजकीय नेत्यांना भेटले आहे. राजघराण्याची भाषा करता आणि वडीलधाऱ्यांच्या संदर्भाने कसे बोलावे याचे तारतम्य तुम्हाला नाही का? पुन्हा असे काही बोलाल तर याद राखा ? तुम्हाला तुमची निवडणूक आली की उदयनराजेंचे बंधूप्रेम आठवते. १९९९ ला बंधू नाही तुम्हाला बंदूक आठवत होती आणि आता तर काट्याने काटा काढायची भाषा करता. येणाऱ्या निवडणुकीत कुणाचा काटा निघणार आहे, हे जनतेने ठरवले आहे, असे वक्तव्य कल्पनाराजे यांनी केले.

Leave a Comment