
पावसाला सुरु झाला की रस्त्यात जागोजागी कणसांच्या गाड्या दिसतात. झणझणीत पेटलेल्या भट्टीवर कोवळी कणसे खरपूस भाजून त्याला मीठ लिंबू लावून खाण्याची मजा काही औरच. या गरमागरम खरपूस भाजलेल्या कणसांचा नुसता वास आला तरी तोंडाला पाणी सुटते. शरीर स्वास्थ्यासाठी कणसे जरूर खावीत पण त्याचबरोबर काही पथ्ये जरूर पाळली पाहिजेत.
खरपूस कणसांचा आस्वाद घेताना हेही लक्षात ठेवा
कणसात फायबर, स्टार्च, प्रोटीन याचे प्रमाण चांगले आहे त्यामुळे कणसाचे सेवन तब्येतीला चांगलेच. कणसे खाल्ल्याने त्यातील फायबरमुळे पोटाचे आरोग्य सुधारते. कणीस खाऊन पोट लवकर भरते. पण एक लक्षात ठेवले पाहिजे कि कणीस खाल्ल्यावर लगेच त्यावर पाणी, ज्यूस, दुध पिऊ नये. कणसातील प्रोटीन्स हाडे मजबूत बनवितात हे खरे. पण कणीस पचायला हलके नाही. कणीस खाल्ल्यावर लगेच पाणी प्यायले, तर कणीस पचायला त्रास होतो. कणसावर पाणी प्यायल्यास पोट जास्त भरते पण कणसाचे दाणे विरघळण्याची क्रिया मंदावते आणि त्यामुळे पोट फुगते. गॅसेस होतात. पोटदुखी होऊ शकते.
मक्यातले कार्ब्स आणि स्टार्च पाण्यात मिसळतात आणि पचनाऐवजी अन्न कुजून अॅसीडीटी होऊ शकते. कणसे खाल्ल्यावर किमान ४५ मिनिटे कोणताही द्रव पदार्थ घेऊ नये. या मधल्या वेळात चयापचय क्रिया वाढते आणि कणसातील पोषक तत्वे रक्तात शोषली जाण्यास वेळ मिळतो. ज्यूस, दुध घेतले तरी चयापचय क्रियेचा वेग मंदावतो कारण त्यातही पाण्याचे थोडे प्रमाण असतेच. त्यामुळे कणीस खा पण योग्य ती काळजी घ्या असे डॉक्टर सांगतात.
