जाणून घ्या बदल झालेले नवीन वाहतूक नियम


नवी दिल्ली – काल राज्यसभेत मोटर वाहन दुरुस्ती विधेयक 2019 मंजूर झाले असून आता वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यानंतर भरण्यात येणाऱ्या चलनाच्या रक्कमेत 10 ट्क्क्यांची वाढ करण्यात आली आहे. देशभरात रस्ते अपघातात मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या मोठी असून रस्ते अपघातात दरवर्षी सुमारे १.५ लाख नागरिकांचा मृत्यू होतो. हा निर्णय अपघाताची वाढती संख्या पाहता घेण्यात आल्याचे केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी म्हटले आहे.

दुरुस्ती विधेयकामध्ये वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर तरतुदी करण्यात आल्या आहेत. विना हेल्मेट फिरल्यानंतर पुर्वी 100 रुपयांचा दंड आकारण्यात येत होता. पण आता 1 हजार रुपये दंड भरावा लागणार आहे. त्याचबरोबर विधेयकात तीन महिन्यासाठी ड्रायव्हिंग लायसन्स जप्त करण्याचा नियम आहे.

वाहन चालवताना मोबाईलवर बोलल्यामुळे अपघात होतात. या विधेयकात याची गंभीर दखल घेतली आहे. वाहन चालवताना फोनवर बोलल्यास 1000 रुपये दंड भरावा लागत होता. आता हा दंड ५ हजार रुपये करण्यात आला आहे. तसेच ड्रायव्हिंग लायसन्स नसल्यास यापुर्वी 500 रुपयांचा दंड आकारण्यात येत होता पण यापुढे आता 5000 रुपये भरावे लागणार आहेत.

तर त्याचबरोबर मद्य प्राशन करून वाहन चालवणाऱ्यांविरोधात कडक नियम करण्यात आला आहे. पुर्वी कलम 185 नुसार 2 हजार रुपये भरावे लागत होते. तर आता 10 हजार रुपये दंड द्यावा लागणार आहे. त्याचबरोबर कलम १८१ अन्वये परवान्याशिवाय गाडी चालवणाऱ्याकडून ५०० रुपये दंड आकारण्यात येत होता. आता दंडाची रक्कम ५ हजार करण्यात आली आहे.

दहा हजार रुपये दंड रुग्णवाहिकेचा रस्ता अडवल्यास आकारण्यात येणार आहे. तर अल्पवयीन मुलांनी गाडी चालवल्यास २५ हजार रुपये दंड आणि ३ वर्षाची शिक्षा ठोठावण्यात येणार आहे. विना तिकिट बसमधून प्रवास केल्यास दोनशे रुपयांऐवजी ५०० रुपये दंड आकारण्यात येणार आहे. याचबरोबर हिट अँड रन केसमध्ये मृत व्यक्तिच्या कुटुंबीयांना केवळ २५ हजाराची भरपाई मिळायची. आता ही रक्कम वाढवून दोन लाख करण्यात आली आहे.

Leave a Comment