मुख्यमंत्री म्हणतात आता भाजपमध्ये नो व्हॅकेन्सी


अमरावती : भाजपच्या महाजनादेश यात्रेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वात सुरुवात झाली. या यात्रेतील पहिली जाहीर सभा अमरावतीतील मोझरी येथे झाली. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यावेळी उपस्थित होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी पाच वर्षातील कार्याचा आढावा मांडला. राज्याच्या विकासासोबतच विदर्भाच्या वाटणीचे विदर्भाला दिल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

विरोधकांना लोकसभा निवडणुकीत धोबीपछाड दिली, आता ते भाजपमध्ये येत आहेत. पण आता भाजपमध्ये व्हॅकेन्सी नसल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. भाषणाच्या सुरुवातीलाच मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना खुले आव्हान दिले. या यात्रेची महाराष्ट्रातील गावागावात जाऊन सेवा करण्यासाठी सुरुवात आम्ही करत आहोत. देशात मोदींच्या नेतृत्वात गाव, गरिब आणि किसान ही त्रिसूत्री घेऊन काम केले. विरोधकांना आव्हान आहे की तुम्ही काय केले आणि आम्ही काय केले ते सांगा. आम्ही कमी पडलो असेल, तर महाजनादेश यात्रेला निघणार नसल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

दीड लाख शेतकऱ्यांना गेल्या पाच वर्षात विजेचे कनेक्शन दिले. 20 हजार कोटींची सिंचनाची कामे केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नितीन गडकरी यांनी विदर्भात निधी दिला त्यांचे आभार. विदर्भ सुजलाम सुफलाम झाला. मोठया प्रमाणात विदर्भात औद्यीगिक गुंतवणूक झाली. एवढी वर्ष विदर्भाचे ओरबाडून नेले, आता मात्र विदर्भाला पैसे मिळाले. आता महामार्ग उभा राहत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

Leave a Comment