खासदार जलील यांच्या विजयी रॅलीत हजारो लिटर पाण्याची नासाडी


औरंगाबाद – पाण्याचा अपव्यय नवनिर्वाचित खासदार इम्तियाज जलील यांच्या विजयी मिरवणुकीत झाल्याचे समोर आले आहे. एमआयएमच्या कार्यकर्त्यांनी शहरातील जुन्या भागात मिरवणूक काढत असताना पाण्यात रंग टाकून टँकरमधील पाणी लोकांवर टाकत पाण्याची नासाडी केली. विरोधकांनी या कृतीमुळे जलील यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

औरंगाबादकरांना ऐन पावसाळ्यात दुष्काळाची झळ बसत आहे. टँकरने विकत पाणी घेण्याची वेळ शहरावर आली आहे. एमआयएमकडून अशामध्ये पाण्याचा मोठ्या प्रमाणात अपव्यय करण्यात आला. याबरोबरच पाण्याचा अपव्यय ज्या खासदाराच्या विजयी रॅलीत करण्यात आला. लोकसभेत त्याच खासदाराने औरंगाबादच्या पाण्याचा प्रश्न उपस्थित केला होता. त्यामुळे खासदार इम्तियाज जलील यांची दुटप्पी भूमिका दिसून येत असल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे.

एमआयएमने लोकसभा निवडनुकीमध्ये औरंगाबादेत आपले खाते उघडले. खासदार म्हणून इम्तियाज जलील निवडून आले. एमआयएम कार्यकर्त्यांनी 2 महिन्यांनी या विजयाचा जल्लोष साजरा केला. पण, त्यांनी विजय जल्लोष साजरा करताना मोठ्या प्रमाणात पाण्याची नासाडी केली. हिरवा, निळा रंग पाण्याच्या टँकरमध्ये मिसळून ते पाणी मिरवणुकीतील सहभागी झालेल्या लोकांवर टाकण्यात आले.

त्यामुळे आता लोकांना या खासदाराचा खरा चेहरा दिसून येत असल्याचा आरोप माजी खासदार आणि शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी केला आहे. तसेच विजयी मिरवणुकीत वापरलेले टँकर महानगरपालिकेचे असतील, तर त्याची त्वरित चौकशी करून कारवाई करणार असल्याची माहिती महापौर नंदकुमार घोडेले यांनी व्यक्त केले आहे.

Leave a Comment