१२ वर्षांच्या रेवंतने केले वाहतुकीचा नियमभंग करणाऱ्याला पकडून देणारे संशोधन


नवी दिल्ली – सरकारसह अनेक संशोधकांना पेटंटची संख्या वाढविण्यासाठी कसरत करावी लागते. केवळ १२ वर्षाच्या नागपुरातील मुलाने अशी स्थिती असताना ४ पेटंट दाखल केली आहेत. अपघात टाळणे, वाहन चोरी झाल्यास पकडणे आदी कामे रेवंतच्या संशोधनातून तयार केलेल्या अॅपमुळे सहजशक्य होतात. देशातील सर्वात कमी वयाच्या संशोधकाचे नाव बी.एस. रेवंत नाम्बुरी असे आहे.

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्यासमोर बी.एस. रेवंत नाम्बुरी याने संशोधनाचे सादरीकरण केले. गडकरींनी यावेळी रेवंतच्या तंत्रज्ञानाचा प्रत्यक्षात वापर करण्यासाठी विभागाकडून मंजूरी देण्यात येईल, असे सांगितले. त्याने तयार केलेल्या क्विक रिस्पॉन्स कोडने नेटवर्क नसले तरी डाटाची छपाई (प्रिंट) करणे शक्य होते. लोकांच्या हिताकरिता मोठ्या प्रमाणात सरकार अथवा खासगी कंपनीकडून या तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणात वापर व्हावा, ही त्यामागे कल्पना असल्याचे रेवंतने सांगितले.

नागपूरमधील माउंट लिटेरा झी स्कूलमध्ये आठवीत रेवंत हा शिक्षण घेत आहे. वाहतुकीच्या नियमभंगाचे रिअल टाईम पाहणे, सीटबेल्ट सेन्सर, ब्रिथलायझर, ह्रदय ठोके मोजणे अशा सुविधा त्याने तयार केलेल्या अॅपमध्ये आहेत. सीपीयूमध्ये ही माहिती संग्रहित होते. त्याबाबतचे वेळोवेळी अलर्ट संबंधित यंत्रणेला देण्यात येतात. नितीन गडकरी म्हणाले, नेहमीच नवसंशोधकांना आणि नवसंशोधन तंत्रज्ञानाना विभागाकडून प्रोत्साहन देण्यात येते. जर हे तंत्रज्ञान तांत्रिक मुद्द्यावर योग्य ठरले तर त्याचा अपघात टाळण्यासाठी विभाग वापर करू शकते.

रेवंतची आई डॉ. शिल्पा शेखर नाम्बुरी म्हणाल्या, माझ्या चारचाकीला वाहतुकीचा रेड सिग्नल तोडून मालवाहतूक करणाऱ्या ट्रकने धडक दिली होती. ट्रक चालक त्यावेळी घटनास्थळावरून पळून गेला. कारमध्ये बसलेल्या रेवंतने या घटनेनंतर अॅप शोधून काढण्याचा निर्णय घेतला. अपघातामधील दोषींवर कारवाई करणे त्याच्या अॅपमुळे शक्य झाले आहे. रेवंत हा वयाच्या १२ व्या वर्षी पेटंट दाखल करणारा देशातील सर्वात कमी वयाचा संशोधक ठरला आहे.

Leave a Comment