गो-हत्या व मॉब लिंचिंगच्या घटनांवर सरसंघचालकांनी मांडले परखड मत


मथुरा – मॉब लिंचिंग आणि हिंदू धर्माला जोडल्याबाबत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी टीका केली आहे. देशात सध्याच्या घडीला हिंदू धर्म व संस्कृतीला जमाव-दंगल-हिंसेच्या नावावर बदनाम केले जात असल्याचे वक्तव्य त्यांनी केले. मोहन भागवत हे वृंदावन येथील वात्सल्य ग्राम येथे संघातर्फे आयोजित करण्यात आलेल्या अखिल भारतीय सामाजिक सद्भाव समितीच्या दोन दिवसीय बैठकीत बोलत होते.

हिंदू धर्म आणि संस्कृतीला देशभरात बदनाम करण्यासाठी काहीजण कट कारस्थान रचत आहेत. जमाव-दंगल तर कुठे हिंसाचाराच्या नावावर राजकारण करून समाजात हिंदू धर्माविषयी विष पसरविले जात आहे. एका योजने अंतर्गत काही राज्यात धर्मांतरनही केले जात आहे. देशाच्या या परिस्थितीकडे बघता, सर्व प्रचारकांनी सावध राहावे, सध्या सावधानता बाळगणे अत्यंत गरजेचे आहे असे ते म्हणाले.

विविध मत-पंथ आणि उपासना पद्धतीच्या लोकांनी हिंदू धर्माच्या रक्षणाकरिता एकत्र येत विविध जाती-धर्माच्या लोकांमधील भेदभावाला संपविण्यासाठीचे प्रयत्न करावे. सामाजिक स्तरावरील हा भेदभाव, हिंसाचार संपला तर कितीतरी प्रश्न मार्गी लागतील असे भागवत म्हणाले. या बैठकीत भारतीय सामाजिक सद्भाव समितीशी संबंधित प्रतिनिधी उपस्थित होते.

उत्तराखंड, बिहार, राजस्थान, हरियाणा, पंजाब, मध्यप्रदेश, गुजरात, जम्मू कश्मीर, कर्नाटक, केरल, छत्तीसगढ़, हिमाचल प्रदेश, दिल्ली, त्रिपुरा और मेघालय सहित सर्व राज्यातील प्रतिनिधी तसेच संघाशी जुळलेल्या इतर कार्यकर्त्यांनी यात आपला सहभाग नोंदविला. संघातील सर्व कार्यकर्त्यांनी आपआपल्या राज्याचे अहवाल सादर केले. संघाचे सह-सरकार्यवाह कृष्ण गोपाल, दत्तात्रेय होसबळे आणि भैय्याजी जोशी यांनी यावेळी आपले विचार मांडले.

Leave a Comment