कुंबळेला चौकार-षटकाराच्या ‘त्या’ नियमासाठी पाचारण


मुंबई – अंतिम सामन्यात झालेल्या थरारक सुपरओव्हरमुळे यंदाची आयसीसी विश्वचषक स्पर्धा लक्षात राहिली. इंग्लंडने चौकार-षटकाराच्या नियमावर पहिल्या विश्वविजेतेपदाला गवसणी घातली. समाजमाध्यमांमध्ये या विजयावर आणि नियमावर वेगवेगळी मते उमटली. आता भारताचा माजी कर्णधार अनिल कुंबळेला याच चौकार-षटकाराच्या नियमासाठी पाचारण केले आहे. आयसीसीची क्रिकेट समिती एकदिवसीय क्रिकेटमधील टायब्रेकरबाबत त्याच्या अध्यक्षतेखाली निर्णय घेणार आहे.

विश्वचषकाच्या अंतिम सामन्यानंतर उद्भवलेल्या समस्यांवर ही समिती आपल्या पुढील बैठकीत चर्चा करणार आहे. आयसीसीचे महाव्यवस्थापक जेफ अॅलडाईस यांनी एका मुलाखतीमध्ये या बैठकीची माहिती दिली आहे. या नियमाच्या आधारे इंग्लंडला विजेता घोषित करण्यात आल्याने आयसीसीवर खूप टीका झाली होती.

सुपरओव्हरच्या वापराबाबत जेफ यांनी स्पष्टीकरण दिले आहे. ते म्हणाले, आयसीसीच्या स्पर्धेत सामना बरोबरीत सुटल्यानंतर निकालाचा निर्णय देण्यासाठी २००९ पासून सुपर ओव्हरचा वापर करण्यात येत आहे आणि सुपर ओव्हरनंतरही सामना बरोबरीत सुटल्यास सर्वाधिक चौकार-षटकार लागवणार्‍या संघालाच विजयी घोषित करण्यात येते. जवळपास सर्व टी-२० स्पर्धेत हा नियम वापरला जातो. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्येही व्यावसायिक स्तरावरचे नियम वापरण्यावर आमचा भर आहे.

Leave a Comment