बॉलिवूडच्या ‘या’ चित्रपटांतून उलगडला ऑपरेशन विजयचा थरार


१९९९ साली कारगिल युद्धात भारताने पाकिस्तानवर अविस्मरणीय विजय मिळवला होता. तब्बल ६० दिवस भारत आणि पाकिस्तानमध्ये हे युद्ध सुरू होते. अखेर भारताने २६ जुलै रोजी पाकिस्तानला मात देत विजयश्री मिळवली होती. तेव्हापासून ‘कारगिल दिवस’ म्हणून २६ जुलै हा दिवस साजरा केला जातो.

भारतीय सैन्याचे ५२७ जवान कारगिल युद्धात शहीद झाले होते. तर, १३६३ जवान जखमी झाले होते. आज या युद्धाला २० वर्षे पूर्ण झाली आहेत. दरम्यान बॉलिवूडच्याही चित्रपटातून कारगिल युद्धाचा थरार प्रेक्षकांसमोर उलगडण्यात आला. हे चित्रपट पाहताना प्रेक्षकांच्याही अंगावर रोमांच उभे राहतात.

‘एलओसी कारगिल’ हा चित्रपट कारगिल युद्धाच्या तीन वर्षानंतर म्हणजे २००३ साली रिलीज झाला होता. बॉलिवूडची तगडी स्टारकास्ट या चित्रपटात झळकली होती. अजय देवगन, संजय दत्त, सैफ अली खान, अभिषेक बच्चन, करिना कपूर आणि सुनील शेट्टी यांच्या या चित्रपटात भूमिका होत्या.

हृतिक रोशनची भूमिका असलेला ‘लक्ष्य’ चित्रपट हा देखील कारगिल युद्धावर आधारित होता. हा चित्रपट २००४ साली रिलीज झाला होता. यामध्ये प्रिती झिंटा, अमिताभ बच्चन, अमरीश पुरी आणि ओम पुरी यांच्याही भूमिका होत्या

२००५ साली अजय देवगन, बॉबी देओल आणि संजय दत्त यांची मुख्य भूमिका असलेला टँगो चार्ली हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. कारगिल युद्धादरम्यान देशात कशाप्रकारे परिस्थिती होती, हे या चित्रपटात दाखवण्यात आले होते.

कारगिल युद्धात शहीद झालेल्या जवानांवर आधारित ओम पुरी आणि गुल पनाग यांची मुख्य भूमिका असलेला ‘धूप’ हा चित्रपट होता. यामध्ये जवानांची कथा दाखवण्यात आली होती.

Leave a Comment