असे झाले होते ‘ऑपरेशन विजय’


आज कारगिल युद्धाला २० वर्षे पूर्ण झाली आहेत. 26 जुलै 1999 रोजी भारताला या युद्धात विजय मिळाला होता. दर वर्षी या स्मरणार्थ 26 जुलैला कारगिल विजय दिवस साजरा केला जातो. पाकिस्तानी घुसखोरांनी कारगिलमधील मोठ-मोठ्या शिखरांवर ताबा मिळवला होता. भारताने यानंतर ‘ऑपरेशन विजय’ आखून येथून या घुसखोरांना पिटाळून लावले होते. भारताच्या विजयानंतर तब्बल 80 दिवस चाललेले हे ऑपरेशन विजय संपले. 8 मे 1999 रोजी सुरू झालेले ऑपरेशन विजय 26 जुलैपर्यंत चालले होते. भारतमातेचे अनेक सुपुत्र या युद्धात कामी आले होते.

पाकिस्तानी सैन्याने कारगिल भागात अत्यंत महत्वाचा असा राष्ट्रीय राजमार्ग 1 ए (श्रीनगर-लेह राजमार्ग) तोडणे, एलओसीची स्थिती बदलणे आणि काश्मीर खोऱ्यासह जम्मू-काश्मिरात फुटीरतावादाला प्रोत्साहन देण्याच्या हेतूने घुसखोरी आणि ताबा मिळविण्याचा प्रयत्न केला होता.

3 मे 1999 रोजी बटालिकमधील जुबर रिगलाईन येथे जम्मू-काश्मिरातील गरखोन गावातील ताशी नामग्याल नावाच्या एका मेंढपाळाने सर्वप्रथम घुसखोर पाहिले. हा मेंढपाळ त्याच्या दोन मित्रांसोबत हरवलेल्या याकला शोधत होता. त्याने यावेळी काळ्या पठाणी पोशाखात सहा पाकिस्तानी सैनिकांना पाहिले आणि त्याने याची माहिती तत्काळ भारतीय लष्कराला दिली.

भारतीय लष्कराने मेंढपाळाने दिलेल्या माहितीनंतर 5 मे रोजी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी गस्ती पथक पाठवले. कॅप्टन सौरभ कालीया पथक गस्त घालत असतानाच अचानकपणे पथकातून गायब झाले. यानंतर 26 मे रोजी भारतीय हवाईदलाने या भागात एअर स्ट्राइकला सुरुवात केली. पाकिस्तानी सैनिकांनी यात भारतीय हवाई दलाचे मिग-२७ पाडले आणि हवाईदलाच्या एका पायलटला युद्धबंदी बनवले.

भारताचे तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी या घटनेनंतर कारगिल भागात युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली असल्याची घोषणा केली. पाकिस्तानने यानंतर काही दिवसांनी आपल्या सहा वीर जवानांचे शव छिन्न-विच्छिंन अवस्थेत पाठवल्यामुळे पाकिस्तानविरुद्ध युद्धाची घोषणा करणे भारताला अपरिहार्य झाले.

युद्धाची घोषणा तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी करताच पाकिस्तानविरुद्ध भारताने थेट लष्करी कारवाई सुरू करत ऑपरेशन विजयला सुरुवात केली. श्रीनगर-लेह महामार्ग यानंतर कुठल्याही प्रकारच्या पाकिस्तानी धोक्यापासून सुरक्षित ठेवण्यासाठी भारताने कारगिल आणि द्रास भागात चढाईला सुरुवात केले. यात हवाई हल्ल्याचाही समावेश होता.

पाकिस्तानची झोप भारताने केलेल्या या कारवाईनंतर उडाली. शांतता चर्चेसाठी त्यांचे परराष्ट्रमंत्री दिल्लीत धावत आले. यशवंत सिन्हा हे तेव्हा भारताचे परराष्ट्र व्यवहारमंत्री होते. त्यांनी यावेळी सर्वप्रथम भारतीय हद्दीत पाकिस्तानने केलेली घूसखोरी मागे घ्यावी, असे म्हणत पाकिस्तानी परराष्ट्र मंत्र्यांच्या वाटाघाटीचा प्रस्ताव धुडकावून लावला होता.

भारताने युद्धाला तोंड फुटल्यानंतर लवकरच टोलोलिंग पहाडावर ताबा मिळवला. नंतर जो संपूर्ण युद्धात अत्यंत निर्णायक आणि महत्वाचा ठरला. याच काळात पंतप्रधान वाजपेयी यांनी कारगिल भागात जबरदस्त शेलिंग होत असतानाच कारगिलला भेट दिली. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन यांनी यानंतर 15 जूनला पाकिस्तानचे तत्कालीन पंतप्रधान नवाज शरीफ यांना कारगिलमधून बाहेर निघायला सांगितले. तसेच मोठ्या लष्करी कारवाईवर संय्यम ठेवल्याबद्दल भारताची प्रशंसाही केली.

4 जुलै 1999 रोजी भारतीय जवानांनी टायगर हिल ताब्यात घेतल्यानंतर नवाज शरीफ यांनी 5 जुलैला वॉशिंग्टन येथे क्लिंटन यांची भेट घेतली आणि कारगिलमधून पाकिस्तानी सैन्य माघारी घेत असल्याचे घोषित केले. यावर प्रत्यक्षात 11 जुलैला पाकिस्तानने कारगिलमधून सैन्य मागे घ्यायला सुरुवात केली आणि १४ जुलैला भारताने ऑपरेशन विजय यशस्वी झाल्याचे जाहीर केले. अखेर, 26 जुलैला कारगिल युद्ध संपुष्टात आले आणि भारताने पाकिस्तानी सैनिकांना भारतीय सीमेतून पूर्णपणे हाकलल्याची घोषणा केली.

Leave a Comment