मी राजकारणाचे धडे कोणा दुसऱ्याकडून नाहीतर आजोबा, वडिलांकडून घेतले


अहमदनगर – राजकारणाचे धडे मी काका राज ठाकरे यांच्याकडून नव्हेतर माझ्या आजोबा आणि वडिलांकडून घेतले असल्यामुळे घेतलेले काम धरसोड न करता प्रामाणिकपणे पूर्ण करायला मला आवडते, असा टोला आदित्य ठाकरे यांनी लगावला.

सध्या आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेची जनआशिर्वाद यात्रा सुरू आहे. यादरम्यान त्यांनी शेतकरी, विद्यार्थी अशा विविध सामाजिक घटकांशी संवाद साधला. त्यांनी अहमदनगरमधील माऊली सभागृहात जनआशिर्वाद यात्रेच्या निमित्ताने महाविद्यालयीन तरुणांशी देखील संवाद साधला. यावेळी तुम्ही राजकारणाचा कोणता धडा काका राज ठाकरे यांच्याकडून घेतला?’ असा प्रश्न एका तरुणाने विचारला. त्या तरुणाच्या प्रश्नाला उत्तर देताना आदित्य बोलत होते.

महाराष्ट्रातील जनतेशी संवाद साधून मी त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी फिरत आहे. माझा जनतेचे प्रश्न सोडवणे हा प्राधान्यक्रम आहे. मला बाकीच्या कुठल्या पदाबाबत स्वारस्य नाही. चंद्रकांत पाटील मुख्यमंत्रीपदाबाबत नेमके काय म्हणाले? मुख्यमंत्री काय बोलले? याबाबतच्या बातम्या मी टीव्हीवर बघितल्या नसल्यामुळे त्यावर बोलणे योग्य नसल्याचे आदित्य म्हणाले.

आदित्य यांना मुख्यमंत्रीपदाच्या रस्सीखेचाबाबत प्रश्न विचारला असता, ते म्हणाले माझ्यासमोर मुख्यमंत्रीपदाचा विषय नाही. फक्त महाराष्ट्र घडवायला मी निघालो आहे. पण माझ्या मुख्यमंत्रीपदाबाबत बोलणाऱ्या लोकांचे माझ्यावर विशेष प्रेम असल्याचे आदित्य म्हणाले.

Leave a Comment