अत्यंत खडतर परिश्रम घेत आपल्या स्वप्नांना हिमाने उतरवले सत्यात


विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघ उपांत्य फेरीत पराभूत झाल्यामुळे या स्पर्धेतून बाहेर झाले तर दुसरीकडे भारताचे नाव आसामच्या एका 19 वर्षीय मुलीने जगात उंचावले. मागील 20 दिवसांत तब्बल 5 सुवर्णपदके भारताची वेगवान धावपटू आणि ‘ढिंग एक्सप्रेस’ अशी ओळख बनवलेल्या हिमा दासने आपल्या नावे केली. अत्यंत खडतर परिश्रम घेत आपल्या स्वप्नांना आंतरराष्ट्रीय स्तरावर विक्रमी कामगिरी करणाऱ्या हिमाने सत्यात उतरवले.

हिमाचा जन्म आसामच्या नागाव जिल्ह्यात एका शेतकरी कुटुंबात झाला. भातशेती तिचे आई-वडील करतात. संपूर्ण शेतीवर आई-वडील आणि ही चार मुले यांचा उदरनिर्वाह अवलंबून होता. पण, हिमा या संघर्षातून वाट काढत प्रकाशझोतात आली. फुटबॉल हा भारताच्या पूर्वेकडील राज्यात लोकप्रिय खेळ खेळला जातो. लहानपणी या खेळाची हिमालाही आवड जडली होती. ती गावात असणाऱ्या भाताच्या शेतात फुटबॉल खेळायची. हिमाच्या शिक्षकांनी तिला हाच खेळ खेळताना पाहिले. एवढी चपळता काटक शरीरयष्टीच्या हिमामध्ये पाहून तिचे शिक्षकही थक्क झाले.

फुटबॉलमध्ये हिमाला कारकीर्द घडवायची होती. पण, हिमा दासने जवाहर नवोदय विद्यालयाचे शारिरीक शिक्षण प्रशिक्षक श्यामशुल हक यांच्या सूचनेवरून खेळ बदलला आणि धावपटू म्हणून प्रशिक्षण घेण्यास सुरुवात केली. कमी व मध्यम अंतराच्या शर्यतींमध्येच सुरुवातीला ती भाग घेत असे. नागाव स्पोर्ट्‌स असोसिएशनच्या गौरीशंकर रॉय यांच्याशी श्यामशुल हक यांनी तिचा परिचय करून दिला. हिमा दास नंतर आंतर-जिल्हा स्पर्धेसाठी पात्र ठरली आणि तिने या क्रीडा स्पर्धांत दोन सुवर्ण पदके जिंकली. त्यानंतर तिने कधी मागे वळून पाहिले नाही.

ब्रम्हपुत्रा नदीला नुकताच पूर आल्याने आसाममधील ३० जिल्ह्यांमध्ये पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली. हिमाने या संकटात सापडलेल्या लोकांना आधार देण्यासाठी आपला अर्धा पगार देण्याचे जाहीर केले. मुख्यमंत्री मदत निधीमध्ये तिने मदतीची रक्कम जमा केली आहे. शिवाय, मोठ्या कंपन्या तसेच नागरिकांना आसामला मदत करा, असे आवाहनही हिमाने केले आहे.

एकाच खेळाने झपाटलेल्या भारताला आज हिमाने स्वत: ची ओळख करून दिली आहे. हिमाने एवढ्या कमी वयात मिळवलेली पदके पाहून लोकांच्याही अपेक्षा उंचावल्या आहेत. तिने येत्या ऑलिम्पिक स्पर्धेत अशीच चमकदार कामगिरी करावी, अशी आशा सर्वजण व्यक्त करत आहेत.

Leave a Comment