मुंबई – काल देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई येथे भाजप कार्यकारिणीचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. जी जी आश्वासने आम्ही निवडणुकीपूर्वी केली होती त्यांची आम्हाला आठवण आहे. अच्छे दिन येतील असे आम्ही जनतेला सांगितले होते. आता त्याची सुरुवात झाली आहे. आम्ही देश बदल रहा है, असे सांगत होतो. आता खरोखरच देश बदलत असून या देशात अच्छे दिन आले आहेत, असे भाजपचे कार्याध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी यावेळी म्हटले आहे.
आपल्या देशाची आणि आपली प्रतिमा जगभरात केवळ भ्रष्टाचारी अशी होती. ती आता पुसली गेल्याने विदेशात राहणाऱ्यांना आपल्या भारतीयांना आपण भारतीय असल्याचा अभिमान वाटत आहे. या बदलाचा प्रभाव अमेरिकेत सुद्धा दिसत असल्यामुळे देश नक्कीच बदलला आहे. जगातील महत्वाचे देश त्यांच्या देशातील सर्वोच्च सन्मान मोदींना देत आहेत. हाच मोठा बदल देशात घडला आहे, असे ते म्हणाले.
मला पक्षाने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या धरतीवर काम करण्याची संधी दिली आहे. आज राजकीय दृष्टीने पाहिले तर काही पक्षाकडे नेता आहे पण निती नाही, तर काहींकडे नैतिकता, कार्यक्रम, आणि कार्यकर्तेच नाहीत. परंतु भाजप हा एकच पक्ष आहे ज्यांच्याकडे नेता, निती, कार्यकर्ता, कार्यक्रम असे सर्व काही आहे.
जे कोणी सदस्य नोंदणीमध्ये सुटलेले आहेत, भाजपसोबत त्या सर्वांना आम्हाला जोडायचे आहे. सर्वात जास्त महत्त्व सदस्य अभिनयानाला द्यायचे आहे. पक्षाला ताकद द्या, मोदी फडणवीस यांनी निर्माण केलेल्या रस्त्यावर चला, बुथवर सर्वात अधिक ताकद द्या, संकल्प असल्याचे आवाहन नड्डा यांनी कार्यकर्त्यांना केले.
१८ हजार गावांना वीज देणे, अडीच कोटी लोकांना वीज देणे ही लहान गोष्ट नाही. आरोग्य, शिक्षण यावर खर्च केला पाहिजे, यासाठी आम्ही ५५ कोटी लोकांना आरोग्य विमा ही सेवा आयुष्यमान भारत च्या माध्यमातून दिलीय आहे. मोदींनी जनधन योजना आणली आणि त्यातून ३६ कोटी खातेदार बनले, यातून एक हजार कोटी रुपये जमा झाले.
आता भारत बदलत आहे. काँग्रेस मुक्त भारत नाही तर भाजपयुक्त भारत आम्ही बनवणार आहोत. काँग्रेस मुक्त म्हणजे भ्रष्टाचार मुक्त, भाजप पक्ष केवळ सेवा करतो. मोदींनी केवळ सेवा केली नाही तर एक नवीन परंपरा आणली आहे. भारतीय जनतेने विकासाला स्वीकारले आहे. असे जे. पी. नड्डा यावेळी म्हणाले.